कोविड काळात गडकरींनी केलं हे काम अन् दरमहा चार लाखांची कमाई सुरू

मागील काही दिवसांपासून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी सातत्यानं प्रकाशझोतात आहेत.
Nitin Gadkari earns monthly 4 lakh rupees from You Tube Video
Nitin Gadkari earns monthly 4 lakh rupees from You Tube Video

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्यानं प्रकाशझोतात आहेत. विविध कार्यक्रमांतून ते मिश्कीलपणे भाष्य करत जुन्या आठवणींसह विविध बाबींचा खुलासा करत आहेत. मुख्यमंत्री बदलाच्या अनुषंगानं केलेलं भाष्य, सासऱ्यांच्या घरावर चालवलेला बुलडोझर याबाबत त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विधानं केली आहेत. गुरूवारीही त्यांनी असाच एक खुलासा केला आहे. (Nitin Gadkari earns monthly 4 lakh rupees from You Tube Video)

गडकरी यांनी गुरूवारी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या कामाच्या पाहणीवेळी एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले, कोविडने मला दोन गोष्टी दिल्या. पहिली गोष्ट म्हणजे मी चांगला शेफ बनलो. त्यानंतर या काळात अमेरिका, न्युझीलंड, जर्मनी आदी ठिकाणच्या देशांमध्ये व्याख्यानं दिली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही व्याख्यानं देत ती यु-ट्यूबवर खूप पाहिली जात आहेत. त्यामुळं त्यामाध्यमातून दर महिन्याला चार लाख रुपये मिळत आहेत, असा खुलासा गडकरी यांनी केला. 

सासऱ्यांच्या घरावर चालवला बुलडोझर

एका रस्त्याच्या कामासाठी त्यांच्या कुटूंबावरच आलेल्या एका संकटाचा गौप्यस्फोट गडकरी यांनी गुरूवारी एका कार्यक्रमात केला होता. 'रामटेकमध्ये असलेले सासऱ्यांचं घर एका रस्त्याच्या कामात येत होतं. पण मागता पुढचा विचार न करता या घरावर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं रस्त्याचं काम पूर्ण झालं. हे घर पाडताना पत्नीला काहीही सांगितलं नव्हतं,' असं गडकरी यांनी सांगितलं. नेत्यांनीच विकासाच्या कामात अडथळा आणू नये, असं गडकरी यावेळी म्हणाले. 

भाजपच्या मुख्यमंत्री बदलाच्या पार्श्वभूमीवर भाष्य

क्रिकेट हा खेळ कौशल्यावर आधारीत आहेत. त्याप्रमाणे राजकारणातही कौशल्य लागतं, असं सांगत गडकरी म्हणाले. पक्षात, पक्षाबाहेर, परिवारात, मतदारसंघात अशा प्रत्येक ठिकाणी समस्या आहेत. सर्वांसमोर अडचणी आहेत. एकदा एकाने विचारले सुखी कोण आहे. कुणीच हात वर केला नाही. कारण जे आमदार होते ते मंत्री झाले नाहीत, म्हणून दु:खी आहेत. मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं नाही म्हणून ते नाराज होते. ज्यांना चांगलं खातं मिळालं पण ते मुख्यमंत्री बनले नाहीत म्हणून दु:खी आहेत. जे मुख्यमंत्री बनले ते दु:खी आहेत कारण त्यांना ते कधी जातील, याची खात्री नाही,' असं गडकरी यांनी नुकतंच एका कार्यक्रमात सांगितलं होतं. 

राज्यात कामाचे नसलेल्यांना दिल्लीत पाठवलं जातं!

शरद जोशी हे हास्यव्यंग कवी होते. त्यांनी एक सुंदर कविता केली होती. जे राज्यात कामाचे नाहीत, त्यांना दिल्लीत पाठवलं. जे दिल्लीत कामाचे नव्हते त्यांना राज्यपाल बनवले. जे राज्यपाल बनले नाहीत, त्यांना राजदूत बनवलं जातं. सर्व पक्षात हे चालतं. मी पक्षाचा अध्यक्ष असताना कुणीही व्यक्ती असं भेटलं नाही, जे दुखी नव्हतं. जो भविष्याची चिंता करतो, तो दु:खी असतो. आयुष्यात खूप संघर्ष असतो. राजकारणही असंच आहे. त्यावर मात करून यशस्वी नेतृत्व होणं, हीच खरी परीक्षा असते, असंही गडकरी म्हणाले.  

राजकारणात कधी हार-कधी जीत, कधी आनंद, मान-सन्मान मिळतो. तर कधी निराशा येते. राजकारणाचा अर्थ काय आहे, यावर विचार करावा लागेल. राजकारण हे सामाजिक, आर्थिक परिवतर्नाचे प्रभावी साधन आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरातील व्यक्तीचं परिवर्तन करून राष्ट्र घडवणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. राजकारणात तर राजकारण होणारच. आजकाल राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण समजलं जात आहे. आपण इथे मंत्री बनण्यासाठी किंवा पोलिस सॅल्युट मारतील म्हणून आलो नाही. देशातील गरिबी, बेरोजगारी, महागाईमधून जनतेला मुक्ती देऊ इच्छितो, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com