मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (ता.१ मार्च) मुंबईत सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळारुन सरकारला घेरले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? सरकार यावर निर्णय का घेत नाही? असे प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केले. त्यावर अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सुरु असलेल्या सरकारच्या आडवणुकीकडे लक्ष वेधले. विकास महामंडळ आम्ही स्थापन करु. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावे जाहीर करतील, त्या दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळ घोषित करु असे पवार म्हणाले.
अजित पवार यांनी १२ आमदारांचा विषय उपस्थित करताच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दादांच्या पोटातले आता ओठांवर आले. १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या कोट्यवधी लोकांना ओलीस ठेवले आहे का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचे आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवारांना उत्तर दिले. आमचे म्हणणे एेकले जात नसेल तर आम्ही एक मिनिट सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचे असेल तर आम्हाला बसवता कशाला, अशा शब्दांत फडणवीसांनी हल्लाबोल केला.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.