शेतकरी आंदोलनाबाबत रामदास आठवले यांचा `बाॅम्ब`

सरकार कायद्यातील बाजू तपासत असून, बदलास अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हित लक्षात घेऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही आठवले यांनी केले.
Ramdas Athawale 1.jpg
Ramdas Athawale 1.jpg

संगमनेर : कोरोनाच्या प्रकोपामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असतानाही, यंदाचा केंद्राचा अर्थसंकल्प शेतकरीहिताचा आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायदे समजून घेण्याची गरज आहे. कृषी कायद्यांविरोधात असत्य गोष्टी सातत्याने शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार असला, तरी हे आंदोलन पंजाब व हरियानामधील 40 शेतकरी नेत्यांनी राजकीय दृष्टीने चिघळवले, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. 

सरकार कायद्यातील बाजू तपासत असून, बदलास अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हित लक्षात घेऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही आठवले यांनी केले. शासकिय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, अर्थसंकल्प व रिपब्लिकन पक्षाचे प्रस्तावित आंदोलनाबाबत माहिती दिली. 

ते म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी कोट्यवधींचा निधी दिला. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून लघु व मोठ्या उद्योगांसाठी मिळालेल्या निधीचा लाभ अनेकांनी घेतला असून, त्या अंतर्गत सुमारे 90 टक्के अनुदान दिले जाते. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ढासळली, तरी त्यामुळे मोठ्या प्रणामात जीवितहानी टळली. अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येईल. मात्र, त्या काळात जीव वाचविण्याला प्राधान्य दिले.''

छोट्या-मोठ्या उद्योगांसाठी मोदी सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ देताना, बॅंकांनी कोणाचीही अडवणूक करू नये. तशी अडवणूक होत असल्यास माहिती द्यावी. येत्या 25 तारखेपासून रिपब्लिकन पक्षातर्फे भूमिहीन, दलित, आदिवासी व मराठा समाजाला सरकारी पडीक जमिनी कसण्यासाठी देण्याची मागणी करण्यासाठी आंदोलने करणार असल्याचे मंत्री आठवले म्हणाले. 

रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, राज्य सचिव विजय वाकचौरे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, तालुकाध्यक्ष आशीष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे डॉ. अशोक इथापे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते. 

स्मार्ट योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

श्रीरामपूर : येथील कृषी विभाग व आत्मातर्फे (स्व.) बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजने संदर्भात आयोजित मार्गदर्शन शिबिर नुकतेच झाले. जागतिक बॅंकेच्या अर्थ सहायातून राज्यभरात (स्व.) बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजना राबविली जात आहे.

तालुक्‍यातील वडाळामहादेव येथील सहकारी सेवा संस्थेतर्फे हरभरा पीक प्रात्यक्षिक प्रकल्पास पुणे येथील कृषी आयुक्तालय स्मार्ट विभागाचे संचालक अनिल गवळी यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेबाबत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, अनिल माने, सुभाष गुरुळे, सरपंच दादासाहेब झिंज, उपसरपंच अशोक गायकवाड, अध्यक्ष उत्तम पवार, उल्हास जगताप उपस्थित होते. प्रकाश आहेर, कृषी सहायक छाया क्षिरसागर, मिनाक्षी बढे, अभिषेक मानकर यांनी परिश्रम घेतले. 
 

Edited By - Murlidhar karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com