संगमनेर : समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संतांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भारतभर भागवत धर्माची पताका फडकवली आहे. त्यांच्या पंढरपूर येथे होणाऱ्या भव्य स्मारकाच्या कामास चालना देऊन सहकार्य करण्याची ग्वाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे प्रभारी अध्यक्ष संजीव तूपसाखरे, उपाध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे व पदाधिकारी उपस्थित होते.
नामदेव समाजोन्नती परिषदेच्या 2014 मध्ये नाशिक येथे झालेल्या 53 व्या अधिवेशनात पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी शासनाने 15 कोटी रुपये निधी मंजूर केला. या वर्षी संत नामदेव महाराज यांचे 750 वे जयंती वर्ष असून, पंढरपूर येथे 65 एकर जागेमध्ये किंवा रेल्वेची 15 एकर जागा या दोन्हीमध्ये त्वरित उपलब्ध असलेल्या जागेवर वाटप किंवा क्षेत्र निश्चित करून मंजुरी देण्यासाठी नामदेव समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांची भेट घेतली.
दरम्यान, स्मारकाच्या या विषयाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा...
पाण्याच्या टाकीच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा असाही वापर
संगमनेर : गेल्या सहा वर्षांपासून विविध उपक्रमातून पाणी बचतीचे प्रत्यक्ष काम पानोडीच्या बालपण स्कूलमधील विद्यार्थ्यांनी केले आहे. आजच्या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी छतावरील पाण्याच्या पुनर्भरणाचे महत्व विषद करीत पाणी बचतीची शपथ घेतली.
अनेक वर्षांपासून तालुक्यातील पानोडी परिसर दुष्काळाचा सामना करीत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जाते. त्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते याची जाणीव झाल्याने, शाळेने जस्ट थॉट फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसवली. शाळेच्या छतावरील सर्व पाणी पाईपद्वारे एकत्रित करून ते पाणी गाळून, 50 हजार लिटर क्षमतेच्या टाकीत साठवले. या पाण्याचा उपयोग हात धुणे, स्वच्छतागृह व शाळेच्या आवारातील वृक्षांसाठी वापरले जाते. अतिशय काटकसरीने या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या असल्याने पाणी वाया जाण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.
ही टाकी भरल्यानंतर ओव्हरफ्लोच्या पाण्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या 100 झाडांच्या केशरबागेचे संवर्धन होत आहे.
जागतिक जल दिनी शासनाच्या माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत जलदिंडी काढली तसेच पाणी बचतीची शपथ घेतली. यावेळी बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे, शिक्षिका दिपाली जाधव, राजश्री बोऱ्हाडे, सुचिता बालोटे, सीमा आव्हाड, कावेरी गांजवे, वंदना घोडेकर, अश्विनी बिडवे, स्नेहल अनाप, अनिता संत आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
Edited By - Murlidhar karale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.