नवी दिल्ली : देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये पुदुच्चेरीत भाजपप्रणित आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज 'ओपिनियन पोल'मध्ये (जनमत चाचणी) व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस आघाडीच्या जागांमध्ये घट होईल , अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक होणार आहे. राज्यात तीन नामनिर्देशित सदस्य असतात. 2016 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. तर एआयएडीएमके व एनआर काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत.
टाईम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या जनमत चाचणीनुसार, भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित यूपीए यांच्यात चुरस होईल. यात एनडीएला 16 ते 20 जागा मिळतील. या वेळी एनडीएला 12 जागा मिळतील. याचवेळी इतर इतरांना एक जागा मिळेल. मागील निवडणुकीत काँग्रेस आणि द्रमुकने 17 जागांसह बहुमत मिळवले होते.
आता एनआर काँग्रेसचे प्रमुख एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास भाजपने तयारी दाखवली आहे. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या काही विधानांमुळे एनआर काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण होते. रंगास्वामी यांनी स्वबळाचा नारा दिला होता. अखेर भाजपने त्यांच्याशी आघाडी केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी रंगास्वामी यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या व्ही. नारायणस्वामी यांच्या नावाला पसंती मिळाली आहे, असे जनमत चाचणीत स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत होणार आहेत. सर्व ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचा पुरेसा बंदोबस्त असणार आहे आणि सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे.
या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. पाचही राज्यांमध्ये भाजप, काँग्रेससह स्थानिक प्रादेशिक पक्षांकडून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे.
निवडणूक तारखा :
तमिळनाडू : एकाच टप्प्यात 6 एप्रिल
पश्चिम बंगाल : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा 29 एप्रिल
केरळ : एकाच टप्प्यात 6 एप्रिल, मल्लपुरम विधानसभा पोटनिवडणूक 6 एप्रिल
आसाम : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल
पुद्दुचेरी : एकाच टप्प्यात 6 एप्रिल
सर्व राज्यांतील मतमोजणी : 2 मे
Edited By Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.