ओपिनियन पोल : ममतादीदी राखणार बंगालचा गड; भाजपचे स्वप्न राहणार अधुरे

देशात चारराज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जनमत चाचणीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज आहे.
times now c voter predicts win for mamata banerjee in west bengal
times now c voter predicts win for mamata banerjee in west bengal

नवी दिल्ली : देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जनमत चाचणीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज आहे. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालच्या लढतीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गड राखण्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

टाईम्स नाऊ-सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार (जनमत चाचणी) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस राज्यातील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवेल. भाजपने तृणमूलमधील अनेक नेत्यांना फोडून पक्षाला खिंडार पाडले होते. याचा फायदा काही प्रमाणात भाजपला होईल. राज्यात भाजपच्या जागा वाढतील. मात्र, सत्तेपासून भाजप दूरच राहील. तृणमूलच्या जागांमध्ये घट होण्याचा अंदाज आहे. 

जनमत चाचणीनुसार, मागील विधानसभा निवडणुकीत तृणमूलला एकूण 294 जागांपैकी 211 जागा मिळाल्या होत्या. या वेळी पक्षाला 154 जागा मिळतील आणि पक्षाला बहुमत मिळेल. भाजपला मागील निवडणुकीत केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या वेळी भाजपला 107 मिळतील. जागा वाढूनही भाजपला राज्यातील सत्तास्थापनेचे स्वप्न साकार करता येणार नाही. 

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणूक नंदिग्राममधून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. याचवेळी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ त्यांनी सोडला आहे. नंदिग्राममधूनच दहा वर्षांपूर्वी डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ममतांनी सत्तांतर घडवले होते. आता या मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी भाजपलाही सुरूंग लावण्याची तयारी केल्याची चर्चा होती. आता भाजपने 57 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली आहे. यातून सुवेंदू अधिकारी हे नंदिग्राममधून लढतील, हे स्पष्ट झाले आहे. 

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यातील 294 पैकी 291 जागांवर तृणमूलचे उमेदवार असतील तर, तीन जागा गोरखा जनमुक्ती मोर्चाला देण्यात आल्या आहेत. या यादीत 50 महिला व 42 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. सध्या आमदार असलेल्या 23 ते 24 जणांना वय आणि इतर कारणांमुळे उमेदवारी नाकारण्यात आले असल्याचे ममता यांनी जाहीर केले. तसेच, त्या नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचेही जाहीर केले. 

ममतांनी नंदिग्राममधून लढण्याची तयारी मागील काही दिवसांपासूनच सुरू केली होती. त्यांनी अधिकृतपणे घोषणा करत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. नंदिग्राम हा तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता नंदिग्राम हा मतदारसंघ तृणमूल व भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरणार आहे. दोन्ही नेते मातब्बर असल्याने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जातील.

ममतादीदींनी जाणीवपूर्वक या मतदारसंघाची निवड केली आहे. राज्यामध्ये 2007 मध्ये डाव्यांची सत्ता असताना नंदिग्राममधील रसायन कारखान्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या आंदोलनानंतर 2011 मध्ये डाव्या आघाडीच्या ३४ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागून सत्तांतर झाले होते. त्यावेळी ममतांच्या विजयात नंदिग्रामचे महत्व अनन्यसाधारण होते. ममतांचे नंदिग्रामशी भावनिक नातेही आहे. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 14 लोक ठार झाले होते तेव्हा सर्वप्रथम घटनास्थळी पोचणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com