बंगळूर : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरू लागल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
ब्लॅक फंगसबद्दल सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या अफवा काही नागरिक खऱ्या मानत असल्याचे चित्र आहे. फ्रीजमधील भाज्या खाल्ल्याने ब्लॅक फंगसचा संसर्ग होतो, अशा पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. विशेषत: यात कांद्याचा उल्लेख करण्यात आला होता. या पोस्टमध्ये काळ्या पडलेल्या कांद्यांचे फोटोही देण्यात आले होते.
तज्ञांनी हा दावा खोडून काढला आहे. तज्ञांनी म्हटले आहे की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. अशा प्रकारे ब्लॅक फंगस पसरत नाही. फळे आणि भाज्यांमधून मानवाला याचा संसर्ग होत नाही. फ्रीजमध्ये आढळणारा फंगस, कांद्यावरील फंगस हा ब्लॅक फंगस संसर्गापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. काही विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंमुळे फ्रीजमध्ये हा फंगस तयार होतो. त्यामुळे विषबाधा इतर त्रास होऊ शकतो. परंतु, त्याचा ब्लॅक फंगसशी संबंध नाही. कांद्यावर आढळणारा काळ्या रंगाचा फंगस हा सामान्यपणे मातीत आढळणारा असतो. परंतु, त्यामुळे मनुष्याला कोणताही त्रास होत नाही. इतर भाज्यां स्वच्छ धुतलेल्या असल्याने त्यांच्यात तो आढळत नाही.
केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आजपर्यंत म्युकरमायोसिसचे 11 हजार 717 रुग्ण आढळले आहेत. यात गुजरातमध्ये सर्वाधिक 2 हजार 859 रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2 हजार 770 रुग्ण सापडले आहे. आंध्र प्रदेशात 768 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण या तीन राज्यांत आहेत. दिल्लीतही याची रुग्णसंख्या वाढत असून, आतापर्यंत 620 रुग्ण सापडले आहेत. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सरकारने आढावा घेतला आहे. हा आढावा घेतल्यानंतर राज्ये आणि केंद्रशासित अॅम्फोटेरीसिन-बीच्या देण्यात येत आहेत. प्रत्येक राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेच व्हाईल्सचा पुरवठा करण्यात आला आहे, असे गौडा यांनी सांगितले.
म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण काही दिवसांत दगावतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे 'सीडीसी'चे म्हणणे आहे. भारतात या आजाराचे दरवर्षी सुमारे डझनभर रुग्ण सापडतात. सर्वसाधारणपणे शरीर अशा प्रकारच्या बुरशीला प्रतिकार करते. परंतु, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले याची शिकार होतात. अवयव प्रत्यारोपण करणारे आणि कर्करुग्णांमध्ये हा आजार आधी प्रामुख्याने आढळून येत होता. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत या आजारामुळे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.