मोदी सरकारचा मोठा निर्णय : म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी पाच कंपन्यांना परवाना

देशात कोरोनाचा कहर वाढला असून, यात आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराची भर पडली आहे. यामुळे सरकारने आता वेगाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
Central government gives licence to 5 companies for Amphotericin B injection production
Central government gives licence to 5 companies for Amphotericin B injection production

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या रुग्णांना अॅम्फोटेरिसीन-बी (Amphotericin-B) हे इंजेक्शन मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे मोदी सरकारने पाच कंपन्यांना या इंजेक्शनच्या उत्पादनासाठी परवाना देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यातील सर्वांत मोठी अडचण ही अॅम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनच्या टंचाईची आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्शन दिली जात आहेत. परंतु, ही इंजेक्शन अपुरी पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने आता पाऊल उचलले आहे. यासाठी केंद्र सरकारने अॅम्फोटेरिसीन-बी या इंजेक्शनच्या उत्पादनाचा परवाना पाच कंपन्यांना दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात असलेल्या भारतीय दूतावासांना संबंधित देशांकडून ही इंजेक्शन उपलब्ध करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. अमेरिकेतील गिलेड सायन्स ही कंपनीही या अॅम्बिसोम या औषधाचा पुरवठा भारताला करीत आहे. आतापर्यंत भारताला अॅम्बिसोमच्या 1 हजार 21 व्हायल्स मिळाल्या असून, आणखी 85 हजार व्हायल्स लवकरच मिळणार आहेत. कंपनी भारताला 10 लाख डोसचा पुरवठा करणार आहे. 

द्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आजपर्यंत म्युकरमायोसिसचे 11 हजार 717 रुग्ण आढळले आहेत. यात गुजरातमध्ये सर्वाधिक 2 हजार 859 रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2 हजार 770 रुग्ण सापडले आहे. आंध्र प्रदेशात 768 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण या तीन राज्यांत आहेत. दिल्लीतही याची रुग्णसंख्या वाढत असून, आतापर्यंत 620 रुग्ण सापडले आहेत. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सरकारने आढावा घेतला आहे. हा आढावा घेतल्यानंतर राज्ये आणि केंद्रशासित अॅम्फोटेरीसिन-बीच्या देण्यात येत आहेत. प्रत्येक राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेच व्हाईल्सचा पुरवठा करण्यात आला आहे, असे गौडा यांनी सांगितले. 

म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण काही दिवसांत दगावतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे 'सीडीसी'चे म्हणणे आहे. भारतात या आजाराचे दरवर्षी सुमारे डझनभर रुग्ण सापडतात. सर्वसाधारणपणे शरीर अशा प्रकारच्या बुरशीला प्रतिकार करते. परंतु, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले याची शिकार होतात. अवयव प्रत्यारोपण करणारे आणि कर्करुग्णांमध्ये हा आजार आधी प्रामुख्याने आढळून येत होता. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत या आजारामुळे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com