नाशिक : ''नागरिक सुधारणा विधेयक देशासाठी आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी हे विधेयक स्वीकारावे व महाराष्ट्रात लागू करावे. यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकारमध्ये असल्याने काही अडचण आल्यास भाजपची चर्चेची दारे नेहमीच मोकळी आहेत," असे आवाहन भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आज येथे शिवसेनेला केले.
भारतीय जनता पक्षाच्या येथील कार्यालयात आज त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेबरोबर आमची युती होऊ शकते, कारण शिवसेना आमचा जुना मित्र आहे, असे विधान केले होते. आज शेलार यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा चुचकारले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शेलार ते म्हणाले, ''या विधेयकाचे शिवसेनेने लोकसभेत समर्थन केले. मात्र, राज्यसभेत ते पळून गेले. आता दोन्ही काँग्रेस सोबत असल्याने राज्यातील सरकार वाचवण्यासाठी विधेयकाविषयी वेगळी भूमिका घेऊन शिवसेनेने देशहित बाजूला ठेवू नये. आपला मूळ बाणा दाखवावा, पळून जाऊ नये."
ते पुढे म्हणाले, "काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलन आहे. यामध्ये भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा, ही काँग्रेसची भूमिका आहे. ही काँग्रेसची नौटंकी आहे. मात्र, सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता. राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा आहे. नागरिक सुधारणा विधेयक अंमलबजावणी देशासाठी आवश्यक असुन घुसखोरांना घालवलंच पाहिजे."
भाजपने विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी विविध नेत्यांची नियुक्ती केली आहे. आमदार शेलार उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर आमचा पराभव झाला. या 12 जागांचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हा पराभव नेमका का झाला? याचा अहवाल लवकरच सादर करणार असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.