चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या आहेत. त्यांच्या आगमनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शशिकलांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी अण्णाद्रमुक पक्षावर दावा करण्यास सुरवात केली आहे. यामुळे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांच्यासह उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम धास्तावल्याचे चित्र आहे.
शशिकलांचे नुकतेच राज्यात आगमन झाले. त्यावेळी अण्णाद्रमुकने विरोध करुनही त्यांनी पक्षाचा ध्वज मोटारीवर लावला होता. सुरक्षेसाठी तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांनी तमिळनाडूत प्रवेश केल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली होती. रस्त्यातच्या दुतर्फा समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचे स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले होते. चेन्नईच्या रस्त्यावरही मोठे फलक लावण्यात आले आहेत. कर्नाटक सीमेवरून त्या थेट चेन्नईकडे रवाना झाल्या होत्या.
हेही वाचा : शशिकलांचा गनिमी कावा
शशिकलांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे भाचे व आमदार टीटीव्ही दिनकरन यांनी सत्ताधारी अण्णाद्रमुक थेट आव्हान देण्यास सुरवात केली आहे. यावर मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी तातडीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज काही जण अण्णाद्रमुकच्या विरोधात कटकारस्थाने करीत आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकला फायदा व्हावा यासाठी हे सुरू आहे. अशा प्रकारची सर्व कारस्थाने आमचा पक्ष हाणून पाडेल.
मागील दहा वर्षे दिनकरन हे पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत. त्यांनी स्वत:ला पक्षाचा नेता घोषित करुन पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला आहे. त्यांनी पक्षाचे 17 आमदार फोडून नेले होते. परंतु, त्यांनी नंतर त्या आमदारांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे त्यांच्या मागे कोणी जाणार असेल तर त्यांच्या नादी लागण्याआधी विचार करावा, असे पलानीस्वामी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : शशिकलांचे शंभर समर्थक मानवी बॉम्ब बनून तयारीत...
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या बंगळूरमध्ये विश्रांती घेत होत्या.
शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.