भाजपचे चार मुख्यमंत्री गेले..आता काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा नंबर

मागील 6 महिन्यांत कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच भाजपच्या चार मुख्यमंत्र्यांची विकेट पडली आहे.
punjab chief minister amarinder singh may resign
punjab chief minister amarinder singh may resign

नवी दिल्ली :  मागील 6 महिन्यांत कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच भाजपच्या (BJP) चार मुख्यमंत्र्यांची (Chief Minister) विकेट पडली आहे. उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातमध्ये वेळेआधीच मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की भाजपवर ओढवली होती. आता काँग्रेसच्या (Congress) पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्र्यांची विकेट पडणार आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) हे थोड्याच वेळात राजीनामा देणार असल्याचे समजते. 

पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद टोकाला पोचला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना हटवले जाण्याचे संकेत मिळत आहे. यासाठी काँग्रेस हाय कमांडने तातडीने आज सायंकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळेत अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. यानंतर 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गुजरातमध्ये रुपानी जाऊन पटेल 
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन आज राजीनामा सोपवला होता. गांधीनगरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले होता. यानंतर मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल हे आले आहेत. 

उत्तराखंडमध्ये चार महिन्यांत 3 मुख्यमंत्री 
उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मार्च महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्रिपदी तिरथसिंह रावत आले होते. त्यांना चार महिन्यांतच जुलैमध्ये मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. नंतर पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी झाली. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वासमोर होता. 

कर्नाटकात येडियुरप्पापर्व संपले 
येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम जुलैमध्ये आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com