धक्कादायक : पायाला गोळी लागलेल्या एसपी निंबाळकरांवरच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

आसाम व मिझोराम सीमेवर केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात केले आहे. असे असले तरी दोन्ही राज्यांतील वाद आणखी चिघळला आहे.
mizoram police registers fir against kachar sp vaibhav nimbalkar
mizoram police registers fir against kachar sp vaibhav nimbalkar

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या  हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.  मिझोरामने आता चक्क आसामच्या मुख्यमंत्र्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यात काचारचे पोलीस अधीक्षक वैभव चंद्रकांत निंबाळकर यांचा समावेश आहे. ते मूळचे इंदापूर तालुक्यातील आहेत. 

सीमेवर झालेल्या हिंसाचारप्रकरणी आसाम पोलिसांनी मिझोराममधील राज्यसभा खासदार के. वानलालवेना यांच्याविरोधात कारवाई करण्याची पावले उचलली आहेत. यानंतर मिझोरामने या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह आसामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मिझोराममधील कोलासिब जिल्ह्यातील वैरेंग्टे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. 

मिझोराम पोलिसांनी म्हटले आहे की, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या आदेशानुसार आसाम पोलिसांनी मिझोराम पोलिसांशी शांततेने चर्चा करण्यास नकार दिला. त्यांनी कोलासिबचे पोलीस अधीक्षकांना कळवले की मिझोरामचा भूभाग आसामच्या मालकीचा आहे. तेथे त्यांनी कॅम्प उभारणीचे नियोजन केले होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांसह आसामचे 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 200 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आसामचे पोलीस महनिरीक्षक अनुराग अग्रवाल, उपमहानिरीक्षक देवज्योती मुखर्जी, काचारचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर आणि धौलाई पोलीस ठाण्याचे प्रभारी साहब उद्दीन यांचा यात समावेश आहे. कचर उपायुक्त कीर्ती जल्ली आणि कचर विभागीय वन अधिकारी सनीदेव चौधरी यांच्यावरही याच आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. सीमेवर झालेल्या हिंसाचारात पोलीस अधीक्षक निंबाळकर हे जखमी झाले होते. त्यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मिझोराम पोलिसांनी त्यांनाही आरोपी केले आहे. निंबाळकर हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसरचे आहेत. 

आसाम -मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे सहा जवान मृत्यूमुखी पडले होते तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे  देशभरात खळबळ उडाली होती. आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांना शांतता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com