नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात उघड बंड पुकारले होते. त्यामुळे काँग्रेस (Congress) हाय कमांडने सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपदी बढती दिली होती. तरीही वाद सुरूच असून आता सिद्धू यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. पक्ष नेतृत्वाने ही बाब गंभीरपणे घेतली असून, सिद्धू यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सिद्धू यांनी काल (ता.27) पक्षनेतृत्वाला आव्हान दिले होते. यानंतर पक्षाचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी कालच अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यांनी राज्यातील पक्षाची परिस्थिती सोनिया गांधींसमोर मांडली. सिद्धू यांनी पक्षाला दिलेले आव्हान आणि त्यांच्या सल्लागारांमुळे निर्माण झालेला वाद याचीही माहिती रावत यांनी दिली. आज रावत हे यासंदर्भात राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. पंजाबमध्ये पक्षांतर्गत वाद सुरू असून, याची माहिती ते राहुल गांधींनी देतील. सिद्धू यांच्या आव्हानाला पक्षाने गंभीरपणे घेतले आहे. त्यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती दिल्यानंतर अनेक वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे सिद्धू यांच्यावर नेतृत्वाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सिद्धू यांचे सल्लागार मलविंदरसिंग माली यांनी काल राजीनामा दिला. यानंतर सिद्धू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या. मला हे स्वातंत्र्य मिळाल्यास पुढील दोन दशके राज्यांत काँग्रेसला वाढवेन. नाहीतर मी कुणालाच सोडणार नाही, असे सिद्धू यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी एकप्रकारे पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले आहे. यावर पक्षनेतृत्व काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनीही सल्लागारांवरून सिद्धू यांना तंबी दिली होती. ते म्हणाले होते, सल्लागारांच्या विधानांना संपूर्ण पक्ष आणि राज्याचा आक्षेप आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, ही पक्षाची भूमिका आहे. हे सल्लागार पक्षाने नेमलेले नाहीत. त्यांना काढून टाकण्यासाठी आम्ही सिद्धू यांना सूचना केलेली आहे. त्यांनी असे न केल्यास आम्ही सल्लागारांची हकालपट्टी करू. पक्षाला अडचणीत आणणारे लोक आम्हाला नको आहेत.
प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच सिद्धू यांनी चार सल्लागारांची नेमणूक केली होती. त्यापैकी प्यारेलाल गर्ग व मलविंदर माली यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. माली यांनी मागील आठवड्यात काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणले होते. तर गर्ग यांनी थेट अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानवर केलेल्या टीकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दोन्ही सल्लागारांची वक्तव्य समोर आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.