नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारामागे भाजपच्या सहकारी पक्षाच्या राज्यसभा खासदाराचा हात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आसाम पोलीस दिल्लीत दाखल झाले असून, खासदाराच्या चौकशीसाठी त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांची परवानगी मागितली आहे.
मिझोराममधील खासदार के.वानलालवेना (K Vanlalvena) यांच्या विरोधात आसाम पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ते सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटचे खासदार असून, हा पक्ष भाजपचा सहकारी पक्ष आहे. आसाम -मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे सहा जवान मृत्यूमुखी पडले होते तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. या हिंसाचारानंतर खासदार वानलालवेना यांनी आसाम पोलिसांनी जाहीर धमकी दिली होती.
खासदाराचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांना सदनाच्या अध्यक्षांची परवानगी आवश्यक नसते. परंतु, खासदाराला अटक करावयाची झाल्यास त्याचे विशेषाधिकार लक्षात घेता सदनाच्या अध्यक्षांची परवानगी लागते. आसाम पोलीस दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे खासदार वानलालवेना यांच्या चौकशीसाठी परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळण्याची शक्यता असून, त्यांना अटकही होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मिझोराममधील राज्यसभा खासदार के. वानलालवेना यांनी प्रसारमाध्यांना मुलाखत दिली होती. यातून त्यांचा या हिंसाचारातील सक्रिय सहभाग समोर आला आहे. या हिंसाचारामागील कटाचा उलगडा झाला असून, हा कट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आमच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक दिल्लीत दाखल झाले आहे. आसाम पोलिसांवर गोळीबार करणाऱ्यांची छायाचित्रे जमा करण्यात आली आहेत. मिझोरामचे पोलीस कर्मचारी आणि काही नागरिकांचा यात समावेश आहे. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यांना आसाम पोलिसांनी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती आसाम पोलिसांनी दिली.
आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांना शांतता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
गृहमंत्री अमित शहा नुकतेच ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील काचर, हेलकांडी आणि करीमगंज या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.