स्वत:ला शेतकरी म्हणवणारेच शेतकऱ्यांचा विश्वासघात करताहेत; कमल हसन यांनी सुनावले

देशभरात कृषी विधेयकांना विरोध होत आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले असताना देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
actor kamal hassan slams chief minister k palaniswami on agriculture bills
actor kamal hassan slams chief minister k palaniswami on agriculture bills

नवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरले असून, आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रोखण्यात आल्या आहेत. आता ज्येष्ठ अभिनेते कमल हसन हे कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर मैदानात उतरले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना फटकारले आहे. 

कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. त्यावर राज्यसभेचीही मोहोर उमटली आहे. देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. ही बहुचर्चित दोन कृषी विधेयके राज्यसभेत विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर झाली. या विधेयकांवरुन सरकार विरुद्ध विरोधक असा वाद पेटला आहे. याचबरोबर घटक पक्षांची नाराजीही समोर आली आहे.  

कृषी विधेयकांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये शेतकरी या विधेयकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. विरोधी पक्षांनीही जोरदार आंदोलन सुरू केले आहे. कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर पंजाबमधील अकाली दल सरकारमधून बाहेर पडल्यानंतर शेजारच्याच भाजपशासित हरियानात राजकीय अस्वस्थता वाढली आहे. याचबरोबर या दोन्ही राज्यांमध्ये या कृषी विधेयकांना विरोध करीत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. 

या विधेयकांना विरोध करीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधून शिरोमणी अकाली दल बाहेर पडले आहे. आता घटक पक्षांच्या नाराजीची मोठी डोकेदुखी सरकारसमोर आहे. सरकारमधील घटक पक्ष बिजू जनता दलाने (बीजेडी) कृषी विधेयकांच्या विरोधात राज्यसभेत भूमिका घेतल्याने खळबळ उडाली आहे. अकाली दलाच्या पावलावर पाऊल टाकत नवीन पटनाईक यांचा बीजेडी सरकारची साथ सोडण्याच्या मार्गावर आहे. हरियानात भाजपबरोबर सत्तेत असलेले जननायक जनता पक्षाचे नेते व (जेजेपी) उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढला आहे. चौताला यांनी हमी भावाला सरकार हात लावेल त्या दिवशी राजीनामा देईन, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. 

तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी कृषी विधेयके तमिळनाडूतील शेतकऱ्यांच्या हिताची असल्याने मी त्यांना विरोध केला नाही, अशी भूमिका घेतली आहे. याचा समाचार आज कमल हसन यांनी घेतला. राज्यांच्या स्वायत्ततेवर हल्ला करणाऱ्या तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षावर हसन यांनी टीका केली आहे. 

हसन यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे स्वत:ला शेतकरी म्हणवून घेतात. मात्र, त्यांनी कृषी विधेयकांना पाठिंबा देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांच्या जिवावर आलेले सरकार हे शेतकरीच पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत गाडून टाकतील. राज्यातील शेतकऱ्यांना अधिक स्वायत्तता देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या अण्णाद्रमुकने आता शेतकऱ्यांशीच द्रोह केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com