पुणे : मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार प्रकरणी सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रीय महिला आयोगाने महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे. तर भाजपने राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी आहे, यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या भूमिकेच्या व विरोधी पक्षातील नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेने उत्तर दिलं आहे. साकीनाका बलात्कार प्रकरण sakinaka rape case, महिला अत्याचाराच्या घटना आणि विरोधी पक्षातून उमटलेल्या प्रतिक्रियेवर शिवसेनेनं shiv sena सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.
'महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य असून असे निर्घृण कृत्य करणारे नराधम कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. तरीही या सर्व प्रकरणावर राज्यातील विरोधी पक्षाने गदारोळ माजवला आहे. राज्यात कायद्याचे राज्य नाही, कायद्याचा धाक नाही, अशी भाषा विरोधकांनी वापरली आहे. भाजपने या प्रकरणात विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे ती चोख बजावली आहे. मुंबई-महाराष्ट्रात महिला कशा सुरक्षित नाहीत, असे तो आता ओरडून सांगत आहे. साकीनाक्याच्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला असला, तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही', असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे. हाथरसच्या घटनेशी साकीनाक्याच्या घटनेची तुलना होऊ शकत नाही, असं म्हणत शिवसेनेनं भाजपच्या भूमिकेवर भाष्य केलं.
राज्यात पाच जिल्ह्यांत ७५ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण ; पुणे आघाडीवर
साकीनाका बलात्कार प्रकरण, महिला अत्याचाराच्या घटना आणि विरोधी पक्षातून उमटलेल्या प्रतिक्रियेवर शिवसेनेनं अग्रलेखातून भूमिका मांडली आहे. 'मुंबईतील साकीनाका परिसरातील एका महिलेवर बलात्कार झाला. या घटनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का बसला आहे. त्या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या व त्याच्यावरील खटला 'फास्ट ट्रक' कोर्टात चालवून लवकरात लवकर त्याला फासावर लटकवले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे', असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'पोलिसांना त्यांचे काम करू द्या. हे तपास पोलिसांनाच करावे लागतात. तरीही साकीनाका प्रकरणाची फाईलही कुणाला 'ईडी' वगैरेकडे सोपवायची असेल तर त्यांना कोण रोखणार? काय वाट्टेल ते करू द्या!', असं म्हणत शिवसेनेनं भाजपला सुनावलं आहे.
'साकीनाक्यासारखी प्रकरणे ही एका भयानक विकृतीतून घडत असतात व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते. हाथरस बलात्कार व हत्या प्रकरणाची तुलना साकीनाका घटनेशी केली जात आहे. ती सर्वस्वी चुकीची आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे त्या मुलीवर बलात्कार करून मारून टाकणाऱ्यांना राजाश्रय होता व आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्या पीडित मुलीचा मृतदेह सरकारने घाईघाईने जाळून पुरावाच नष्ट केला व तिच्या कुटुंबापर्यंत कोणालाच पोहोचू दिले जात नव्हते. हाथरस प्रकरणात ''बलात्कार झालाच नाही हो!'' असे योगींचे सरकार सांगत होते, ते शेवटी खोटे ठरले', असं अग्रलेखात म्हटलं आहे.
Edited by : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.