सोलापूरसाठी खलनायक ठरलेल्या भरणेंना राष्ट्रवादी पालकमंत्रीपदावरून हटवणार का?

सोलापूर जिल्हा आता भाजपकडे झुकू लागला आहे.
Will NCP remove Dattatreya Bharane from the post of Guardian Minister of Solapur?
Will NCP remove Dattatreya Bharane from the post of Guardian Minister of Solapur?

सोलापूर : इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) हे इंदापूर तालुक्यासाठी जलनायक ठरले आहेत. इंदापूरसाठी जलनायक ठरत असलेले भरणे सोलापूरसाठी (Solapur) पालकमंत्री म्हणून खलनायक ठरू लागले आहेत.

कोरोनाचे संकट परतवून लावण्यात निष्क्रिय ठरलेल्या पालकमंत्री भरणे यांच्या माथी आता सोलापूर जिल्ह्याच्या पाणीचोरीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पालकमंत्री भरणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात जनभावना तीव्र होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता तरी या भावनेचा विचार करून पालकमंत्र्यांना हटवणार की आपलेच घोडे दामटवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Will NCP remove Dattatreya Bharane from the post of Guardian Minister of Solapur?)

सोलापूर जिल्ह्याला आजपर्यंत अनेक मंत्री व पालकमंत्री मिळाले. कोणत्या मंत्र्यांच्या काळात सोलापूर जिल्ह्याला काय मिळाले? याची आठवण व लेखाजोखा काढला जातो. या  मंत्र्यांच्या काळात सोलापूरचा हा प्रश्न मार्गी लागला, त्या मंत्र्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी कष्ट घेतले अशी अनेक उदाहरणे सांगितली जातात. पालकमंत्री भरणे यांच्या बाबतीत मात्र सोलापूरकरांना वेगळाच अनुभव आला आहे.

भरणे यांच्या काळात सोलापूरला काय मिळाले? यापेक्षाही सोलापूरकरांच्या वाट्याचे हक्काचे पाच टीएमसी पाणी भरणे यांनी त्यांच्या तालुक्यासाठी पळविले, हा आरोप भरणे यांना आयुष्यभर सहन करावा लागणार आहे. ज्या ज्या वेळी भरणे यांचा भविष्यात विषय निघेल, त्यावेळेस पाणीचोरीचा हा शिक्का कायम स्मरणात राहील. 

सव्वा वर्षात सोलापूरला काय मिळाले

सोलापूर शहर व जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी पालकमंत्री भरणे यांच्याकडून ठोस उपाययोजना अपेक्षित होती. रेमडेसिव्हिर इंजेक्शन, कोरोना लसीचा पुरेसा साठा, रुग्णांना ऑक्सिजन बेड या तीन महत्त्वाच्या गोष्टी मिळवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना सध्या पदोपदी झगडावे लागत आहे. यातील कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. रुग्णांचे नातेवाईक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेकांच्या हातापाया पडून या गोष्टी मिळवत आहेत. स्वाभिमानी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांवर अशी लाचारीची वाईट वेळ आली आहे. याचा थोडा तरी विचार पालकमंत्री करतील का?, गेल्या वर्ष - सव्वा वर्षाच्या काळात भरणे यांनी सोलापूरसाठी काय केले? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. 


पालकमंत्र्यांनी सोलापुरात तळ ठोकायला हवा 

भीमा नदी ओलांडल्यानंतर शेजारच्या इंदापूर तालुक्यातून पालकमंत्री भरणे सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येतात. दुपारी आलेले पालकमंत्री सायंकाळी पुन्हा आपल्या घरी जातात. नववधूप्रमाणेच पालकमंत्री भरणे सोलापूरचा दौरा करतात आणि निघून जातात. या दौऱ्यातून काय साध्य होते? या प्रश्नाचे उत्तर ना सर्वसामान्यांना मिळाले ना जिल्हा प्रशासनाला मिळाले आहे. सोलापूर शहर व जिल्हा कोरोनाच्या भीषण संकटाचा सामना करत असताना भरणे यांनी सोलापुरात तळ ठोकून राहणे अपेक्षित होते. सध्या मात्र तसे घडताना दिसत नाही. 

फडणवीस-सोलापूरचे नाते राष्ट्रवादीसाठी अडचणीचे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मनापासून प्रेम करणारा आणि मर्जीतला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. स्थानिक भावना व प्रश्नांचा विचार न करता राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापूरबाबत निर्णय घेऊ लागल्याने सोलापूर जिल्ह्याचा कल आता बदलत आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा आता भाजपकडे झुकू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या तब्बल 11 पैकी सहा जागा या भाजपकडे आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आता सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार आणि सोलापूर यांच्यातील नाते जुन्या पिढीने पाहिले. आता तेच नाते सोलापूर आणि फडणवीस यांच्याबाबत आकारास येऊ लागले आहे. हेच नाते भविष्यात राष्ट्रवादीला अडचणीचे ठरू शकते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com