इंदापूर (जि. पुणे) : "शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास गमावला आहे. इंदापूरचे सध्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्य मंत्री हे मी 20 वर्षाच्या काळात काय केले, असा जाहीर सवाल करत आहेत. इंदापूर तालुक्यातील वीज मंडळाचे जाळे माझ्या मंत्रिपदाच्या कालावधीत झाले. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी पोकळ विकासाच्या गप्पा मारू नयेत,'' अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नाव न घेता राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर केली.
माजी मंत्री पाटील हे इंदापुरात बोलत होते. ते म्हणाले की, चालू वर्षी शेतकरी हे कोरोना, त्यानंतर तीव्र अतिवृष्टीमुळे शेती नुकसानीत जाऊन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे.''
इंदापूर तालुक्याचे काठावर पास झालेले राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. मात्र, सध्याच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेसंदर्भात ते एक शब्दही बोलत नाहीत. कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज कनेक्शन तोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप भाजप नेते पाटील यांनी केला.
शेतीसाठी वीजपुरवठा महत्त्वाचा असल्याने माझ्या मंत्रिपदाच्या काळात वीज उपकेंद्राची मोठ्या संख्येने उभारणी केली होती. माझ्या मंत्रिपदाच्या काळात एकदाही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. मात्र, राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांवर वीज कनेक्शन तोडणीचे संकट टाकले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशा शब्दांत हर्षवर्धन पाटील यांनी भरणेंवर हल्लाबोल केला.
मी वीस वर्षे मंत्रिपदाच्या काळात काय केले? असे विचारणाऱ्या राज्यमंत्र्यांनी त्यांच्या काळात तालुक्यात एकतरी वीज उपकेंद्र उभे केले का? याउलट मी राज्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे इंदापूर तालुक्यात निर्माण केले आहे. त्यामुळे गेली 25 वर्षांत शेतीला पुरेशा दाबाने व नियमितपणे वीज पुरवठा होत आहे, असा टोला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.