कोणाबरोबरही युती न करता भाजप स्वबळावर 115 जागा लढवणार 

भाजप आणि बविआ एकत्र निवडणूक लढविण्याच्या शक्‍यतेला या घोषणेनंतर पूर्णविराम मिळाला.
BJP will contest 115 seats on its own in Vasai-Virar municipal elections
BJP will contest 115 seats on its own in Vasai-Virar municipal elections

विरार : वसई-विरारच्या विकासाला कटिबद्ध राहून रस्ते, पाणी आणि येथील दहशत-गुन्हेगारीच्या समस्या भारतीय जनता पक्ष सोडवेल, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि वसई विरारचे जिल्हा प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी नालासोपारा येथे सांगितले. भारतीय जनता पक्ष आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाबरोबर युती न करता स्वबळावर सर्वच्या सर्व 115 जागा लढवणार असल्याची घोषणाही या वेळी त्यांनी केल्याने भाजप आणि बविआ एकत्र निवडणूक लढविण्याच्या शक्‍यतेला या घोषणेनंतर पूर्णविराम मिळाला. 

वसई विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रभारी आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी वसई-विरारचा दौरा केला. या वेळी त्यांच्याबरोबर सहप्रभारी जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत आणि जिल्हाध्यक्ष राजन नाईक हेसुद्धा उपस्थित होते. 

लाड म्हणाले की, महापालिका क्षेत्रामध्ये जे वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत, त्यांनी या शहरांच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. वसई-विरार मागास आणि अविकसित कसे राहील आणि त्यातून आपली पोळी कशी भाजली जाईल, याकडेच येथील राज्यकर्त्यांनी लक्ष दिले आहे. वसई विरारमध्ये गुंडशाही, खंडणी, वसुली, महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, असेही ते म्हणाले. 

कोळी बांधवांसाठी असलेल्या शहरातील राखीव भूखंडावर एका नाव बदललेल्या बांगलादेशीने अतिक्रमण केले आहे. तसेच, वसई विरार शहरातील अतिक्रमण वाढत असल्याचा आरोपसुद्धा प्रसाद लाड यांनी केला. 

सर्वाधिक जागा जिंकू 

आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या 115 जागांसाठी तब्बल 210 इच्छुकांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. त्या प्रत्येकाशी आम्ही बोललो आहोत. या प्रतिसादाच्या जोरावर आम्ही वसई विरार महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जागा जिंकू, असा दावा देखील लाड यांनी केला. 

हेही वाचा : महाआघाडीला कॉंग्रेसच्या, तर सहकार पॅनेलला भाजपच्या नाराजीचा फटका बसणार? 

ठाणे : सहकार क्षेत्रामध्ये सर्वांत श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळासाठी उद्या (मंगळवारी, ता. 30 मार्च) मतदान होणार आहे. सहकार पॅनेलविरोधात महाविकास आघाडी परिवर्तन पॅनेल अशी थेट निवडणूक होणार आहे. 

या अगोदर सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे आता 15 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 46 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण 18 केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून या वेळी सुमारे तीन हजार 62 मतदार हक्क बजावणार आहे. 

कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक होणार असल्याने एका केंद्रावर केवळ 300 मतदारांनाच परवानगी देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 110 निवडणूक कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. 

धुळवडीच्या दुसऱ्याच दिवशी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळासाठी मतदान होणार आहे. बॅंकेवर बहुजन विकास आघाडीप्रणित सहकार पॅनेलच्या (या पॅनेलमध्ये भाजपचा समावेश आहे) संचालक मंडळाचे वर्चस्व आहे. त्याला टक्कर देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाविकास आघाडीप्रणित परिवर्तन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली आहे. सहकार पॅनेलला शिट्टी; तर परिवर्तन पॅनेलला कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. बविआने भाजपला या निवडणुकीत गुंडाळल्याची चर्चा आहे; तर महाविकास आघाडीने कॉंग्रेसला कमी जागा दिल्याने थोडा नाराजीचा सूर होता. त्यामुळे या मतभेदाचा परिणाम मतदानावर किती होतो, हे पाहणे गरजेचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com