मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही स्वागत केले आहे. सीबीएसईपेक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या (HSC Board) बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळं राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द होण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेतही शिक्षणमंत्र्यांनी दिले असून आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (The states Class XII exams are also likely to be canceled)
सीबीएसईच्या परीक्षांबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतखाली मागील आठवड्यात बैठक झाली होती. या बैठकीत सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये काही राज्यांनी परीक्षा रद्द करण्याच्या सुचना केल्या होत्या. तर काही राज्यांनी विविध पर्याय समोर ठेवले होते. त्यानंतर काल पंतप्रधान मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या परीक्षा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांनी त्याचे स्वागत केले आहे. राज्यातील दहावीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्याचे सुतोवाच करण्यात आले होते. पण कोरोनाची स्थिती सुधारत असली तर पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. त्यामुळं राज्यातील परीक्षांबाबत अनिश्चितता वाढली होती. आता सीबीएसईची परीक्षा रद्द झाल्याने राज्यातील परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य शासन घेऊ शकते. तसे संकेतही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिले आहे.
गायकवाड यांनी परीक्षांबाबत ट्विट केलं आहे. त्या म्हणाल्या, कोरोनाची सध्याची परिस्थिती व मुलांवर याचा होणारा परिणाम तसेच परिक्षेच्या संभ्रमावस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव आहे. अशा परिस्थितीत परीक्षे ऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा. केंद्र सरकारने देशपातळीवर याबाबत एकसुत्र धोरण निश्चित करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करून केंद्रसरकारने CBSE बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे.
शैक्षणिक जीवनातील बारावी परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. यापुढे महाराष्ट्र शासन देखील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल. घरी रहा काळजी घ्या, असे गायकवाड यांनी म्हटलं आहे. विद्यार्थी व पालकांमधील संभ्रम अधिक वाढू नये, यासाठी आजच परीक्षांवर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.