राज्यपाल व मुख्यमंत्री यांची बहुचर्चित भेट झालीच नाही...

विधान परिषदेवरील बारा नावांचा प्रश्न..
Uddhav-Bhagatsinh
Uddhav-Bhagatsinh

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी (Governor Koshiyari) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज भेट होणार असल्याची नुसतीच चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे देखील ठाकरे यांच्यासोबत जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात भेट झालीच नाही. दुसरीकडे आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमानिमित्त राजभवन येथे होते. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावरील `एक मनोहर कथा` या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे आज झाले. 

राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नेमावयाच्या  बारा आमदारांच्या नावांसदर्भात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष आहे. तो न्यायालयातही गेला. मात्र राज्यपालांना आदेश देण्याबाबत उच्च न्यायालयाने असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांनी राज्यपालांना याबाबत विचारले असता त्यांनी अजितदादा माझ्याकडे आग्रह धरत नाही, असे त्यांनी शेजारी असलेल्या अजित पवारांकडे स्मितहास्य करत सांगितले. त्यावर दोन दिवसांनी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांकडे विचारणा केली असता त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री हे पुढील आठवड्यात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती.

 ती भेट आज होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून देण्यात आली होती. संध्याकाळी साडेसहा वाजता वेळ ठरली असल्याचाही निरोप देण्यात आला होता. त्यानुसार माध्यमांच्या प्रतिनिधींची राजभवन परिसरात गर्दी झाली होती. प्रत्यक्षात या भेटीबाबत दुपारपर्यंत काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना माहितीच नव्हती, असे कळाले. राज्यपाल आणि महाविकास आघाडी मंत्र्यांच्या बैठकीबाबत राजभवनावर विचारले असता अशी वेळच मागितली नसल्याचे राजभवनावरून स्पष्ट केले.
दरम्यान त्या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवनवर एका कार्यक्रमासाठी गेले होते. पुस्तक प्रकाशन कार्यक्रम सुरू असताना आणि कॅबिनेट बैठक संपल्यावर थोड्या वेळातच होणार नसल्याची माहिती समोर आली.

खडसे यांच्या नावावरून वाद?

राज्यपालनियुक्त आमदारांसाठी एकनाथ खडसे यांच्या नावाची शिफारस सरकारने केली आहे. खडसे यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू असल्याने त्यांच्या नावाला मान्यता देण्याबाबत राज्यपाल तयार नसल्याची चर्चा आहे. या विषयावरील न्यायलयीन निकालानंतर राज्यपालांनी दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत या नावांवर विचार झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर यातून तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र ती भेटच अद्याप होत नसल्याने शिफारस झालेले इच्छुकही प्रतिक्षेत आहे. या नावांसाठी शिफारस करून नऊ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com