पालकांनो, घाबरू नका! मुलांना कोरोना संसर्गाबाबत 'एम्स'च्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला. तर दुसऱ्या लाटेत तरूण रुग्णांची संख्या अधिक आढळून आली. देशात पुढील काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा दावा अनेक तज्ज्ञांनी केला आहे. याबाबत 'एम्स'चे संचालक डॅा. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी महत्वाची माहिती दिली. (Children might not impact in Covid19 third wave says AIIMS Director)
डॅा. गुलेरिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत लहान मुलांना असलेल्या धोक्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होईल, असे बोलले जात आहे. पण पेडिअॅट्रीक असोसिएशनने हा दावा तथ्यांवर आधारीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळं तिसऱ्या लाटेत अधिक मुलं बाधित होणार नाही. लोकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहनही डॅा. गुलेरिया यांनी केलं आहे.
दरम्यान, देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. रुग्णांच्या संख्येप्रमाणेच मृतांचे आकडेही जगात सर्वाधिक ठरले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, दिल्लीसह काही राज्यांमध्ये रुग्णांना बेड मिळत नव्हते. ऑक्सीजन व औषधांचा तुटवडाही मोठ्या प्रमाणावर जाणवला. काही राज्यांतील लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे देशातील दुसरी लाट जुलै महिन्यापर्यंत राहील, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारच्या तीन सदस्यांच्या शास्त्रज्ञांच्या पॅनेलने याबाबत अभ्यास केला आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट जुलै महिन्यानंतर ओसरेल, असे सांगण्यात आले आहे. तर तिसरी लाट येणार असून ती सहा ते आठ महिन्यांनी येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पण तिसरी लाट अधिक तीव्र नसेल, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी लसीकरण हे एकमेव कारण असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शास्त्रज्ञांनी वापरलेल्या मॅाडेलनुसार देशात मे अखेरीस नवी रुग्णांची दैनंदिन संख्या दीड लाखांपर्यंत खाली येईल. तर जुन महिनाअखेरीस हा आकडा २० हजार एवढा असेल.
कोणत्या राज्यांत गाठले टोक?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरयाणा, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी काही दिवसांपूर्वीच टोक (Peak) गाठले असल्याचे पॅनेलचे सदस्य व आयआयटी कानपुर येथील प्राध्यापक महिंद्र अगरवाल यांनी सांगितले. तर तमिळनाडूमध्ये २९ ते ३१ मेदरम्यान दैनंदिन रुग्णसंख्या सर्वाधिक असेल, असेही त्यांनी सांगितले. इतर राज्यांमध्ये अद्याप तेवढी रुग्णसंख्या वाढली नाही.
तिसऱ्या लाटेची तीव्रता किती?
कोरोनाची तिसरी लाट काही भागापुरतीच मर्यादीत असले. तसेच जास्त लोकांना संसर्ग होऊ शकणार नाही. कारण लसीकरणामुळे अनेकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असेल. तिसरी लाट किमान ऑक्टोबरपर्यंत येणार नाही, असे अगरवाल यांनी स्पष्ट केलं.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.