हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा नक्की फायदा की तोटा?

जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियावरील हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा वापर कोरोनावरील उपचारासाठी करणे धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला होता. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मात्र, या गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे म्हटले आहे.
icmr advises use of hydroxychloroquine on corona patients
icmr advises use of hydroxychloroquine on corona patients

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा दुष्परिणांमावरुन मोठा वादंग सुरू असताना आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या गोळ्यांमुळे कोणतेही मोठे दुष्परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही, असे म्हटले आहे. या गोळ्यांचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत असेही संशोधनात आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कोरोना रुग्णांवर करण्यास नुकतीच स्थगिती दिली आहे. या गोळ्यांमुळे मृत्यूही होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्याला आता 'आयसीएमआर'ने प्रत्युत्तर दिले आहे. संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना विषाणू हा एक नवाच आजार आहे. त्यावर योग्य आणि प्रभावी वैद्यकीय उपचार काय हे जगात कोणालाच अजून माहिती नाही. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या मुख्यतः मलेरियावर दिल्या जातात. कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून त्यांना अमेरिकेपासून जगभरातून वाढती मागणी आहे. भारतात या गोळ्यांचे जगाच्या तुलनेत ७० टक्के उत्पादन होते. मात्र या गोळ्यांच्या सरसकट आणि अतिवापराबद्दल खुद्द आरोग्य मंत्रालयाने मध्यंतरी सावधगिरीचा सल्ला दिला होता. रिकाम्यापोटी जे या गोळ्या घेतात त्यांना चक्कर येणे यासारखे विकार उद्भवू शकतात, असे आज स्पष्ट करण्यात आले. 

दिल्लीतील तीन रुग्णांलयांमध्ये संशोधन 

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या कोरोनावरील उपचारांबाबत ‘एम्स’सह दिल्लीतील तीन प्रतिष्ठित खाजगी रुग्णालयांनी संशोधन केले होते आणि त्यांच्या निरीक्षणानुसार या गोळ्या घेतल्याचे कोणतेही साईड इफेक्टस् नाहीत. यामुळे फार मोठा दुष्परिणाम होतो हेही आढळलेले नाही. मात्र या औषधाचा रुग्णांवर उपचार करताना ‘ईसीजी’ काढणे आवश्यक असल्याचेही अभ्यास पाहणीत नमूद करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

मृत्यू दर आणि रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे या दोन्ही बाबतीत लॉकडाऊनच्या चारही टप्प्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. देशात कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला, त्यातील ५० टक्के ज्येष्ठ नागरिक होते. त्यामुळे सरकार जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेत आहे असेही सरकारने म्हटले. 

भारतातील कोरोना संसर्ग  

६०४९० : बरे झालेले रुग्ण 
४१.६१ टक्के : बरे होण्याचे प्रमाण 
७.१ टक्के : मार्चमधील बरे होण्याचे प्रमाण 
१०.७ : दर एक लाख लोकांमागील रुग्ण 
२.८७ टक्के : मृत्यूदर 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com