नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बॅनर्जी आणि अर्थतज्ज्ञ एस्थर डफ्लो या दोघांनीही भारत सरकारने प्रत्येक भारतीयाला एक हजार रुपयांची रोख मदत करावी, असे मत व्यक्त केले आहे. ही मदत तात्काळ स्वरुपात युनिव्हर्सल बेसिक इन्कम (युबीआय) या स्वरुपात केली पाहिजे. 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेबरोबरच ही रोख रक्कम प्रत्येक भारतीयाला दिली पाहिजे. दोन्ही अर्थतज्ज्ञांनी जयपूर साहित्य संमेलनाच्या ऑनलाइन कार्यक्रमात हे मत व्यक्त केले आहे. आपल्या आपत्कालीन किंवा जीवनावश्यक गरजा भागवण्याच्या संदर्भात सरकारची ही मदत प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाची ठरू शकते, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
कोरोना महामारीच्या संकटाचा जगाबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा विपरित परिणाम झाला आहे. एकीकडे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत तर दुसरीकडे रोजगार गेल्यामुळे अनेकांना आर्थिक समस्या भेडसावते आहे. देशातील मागणीत आगामी काळात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. यासाठी सरकारने सर्वसामान्यांच्या हाती पैसा द्यायला हवा. सर्वसामान्यांच्या हाती पैसा दिल्यामुळे मागणी वाढून अर्थव्यवस्था सावरायला मदत होईल, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. सरकारच्या 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजनेचे बॅनर्जी यांनी स्वागत केले आहे. मात्र त्याचबरोबर या योजनेची अंमलबजावणी तात्काळ स्वरुपात झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
हे देखील वाचा : चीनकडून पुन्हा कुरापत; भारताच्या हद्दीत घुसखोरी
वर्ष १९९१ च्या आर्थिक संकटापेक्षा कोरोना महामारीमुळे निर्माण झालेले संकट कितीतरी मोठे असून त्याचा मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे, अशी चिंता बॅनर्जी यांनी याआधी या महिन्याच्या सुरूवातीला व्यक्त केली होती. कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे भारताचा विकासदर नकारात्मक होण्याची भीती बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. भारत सरकारने गरीबी निवारणाच्या योजनांवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करायला हवा. त्याशिवाय मर्यादित वित्तीय पर्यायांमध्ये सरकारने अधिक चलन छापावे असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
सरकारने सद्यपरिस्थितीत आणखी वित्तीय तरतूद केली पाहिजे. पुढील वर्षापर्यत भारतीय अर्थव्यवस्था सावरेल का या प्रश्नावर जर भारत सरकारने बाजारातील मागणीत घट होऊ नये यासाठी योग्य पावले उचलली तर हे शक्य होईल. सरकारने अर्थव्यवस्थेतील मागणी वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, अधिक पैसा खर्च केला पाहिजे, असे स्पष्ट मत बॅनर्जी यांनी सद्य परिस्थितीवर व्यक्त केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.