उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते पुन्हा पक्षात येण्यास उत्सुक आहेत. सर्वांना बरोबर घेणे, बेरजेचे राजकारण असले तरी टप्प्याटप्प्याने प्रवेशाचे कार्यक्रम होतील. आता कोरोनामुळे कुठेही जाता येत नाही. सोलापुरातील एमआयएमचा एक मोठा ग्रुप राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करण्याची इच्छा बाळगून आहे. जाहीर कार्यक्रम घ्यावा, असे त्यांना वाटते. पण, सध्या जाहीर कार्यक्रम घेता येत नाही. असे अनेक ठिकाणचे प्रवेश आम्ही थांबवले आहेत. कारण, जाहीर प्रवेश करण्याची इच्छा बरेचजणांना आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. (Many BJP leaders want to join NCP: Jayant Patil)
‘राष्ट्रवादी परिसंवाद यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्यास आज (ता. २४ जून) सकाळी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून झाली. सध्या मंदिरे बंद असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेचे महाद्वारातूनच दर्शन घेतले. मराठवाड्यातील राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेत समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर हे सहभागी झाले आहेत.
राज्यभरासह उस्मानाबादमधील (विधानसभा निवडणुकीवेळी पद्यसिंह पाटील व त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला आहे) पक्ष सोडून गेलेले नेते राष्ट्रवादीत परत येण्यास उत्सुक आहेत, असे सांगितले जात आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले, भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र, मंदिरे उघडल्यानंतरच त्यांच्या पक्ष प्रवेशाचा महूर्त सापडेल. सध्या कोरोना असल्याने पक्षप्रवेश रखडले आहेत. पक्ष सोडून गेलेले स्वगृही येण्यास उत्सुक आहेत. पण, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि टप्याटप्याने प्रवेश दिले जातील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळाची चाचपणी करत नाही. महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल. पण, काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल, असे वाटत नसल्याने काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे म्हणत जयंत पाटलांनी स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला टोला लगावला आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याच पुन्हा समोर आलं आहे, असंही वक्तव्य जयंत पाटलांनी या वेळी केलं. महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट लवकर टळावे. कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या घटकांना जगण्याची नवी उमेद निर्माण करण्याचा आशीर्वाद द्यावा, तसेच चांगला पाऊस पडून राज्यातील धरणे भरावीत, असं साकडं आई तुळजाभवानीला घातलं, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.