नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत एकमत नाही. तिन्ही पक्ष गोंधळलेले दिसतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मध्यावधी निवडणूक घेण्याचा विचार करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की, निवडणूक घेतल्यास आपली हार निश्चित आहे. जनतेमध्ये या सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. चुकूनही सरकारने निवडणुका घेतल्या तर सरकार कोसळेल then mahavikas alliance government will be collapse असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis आज म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे होते.
उद्या सट्टेवाल्यांनीही मंत्र्याची पूजा केली तर नवल नाही…
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची आरती ओवाळत चंद्रपुरमध्ये एका बारमालकाने पूजा केली. त्यावरून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच टोले हाणले. आज बारमालकाने मंत्र्याच्या फोटोची पूजा केली. उद्या सट्टेवाल्यांनीही मंत्र्यांची पूजा केली तर नवल वाटायला नको, असे म्हणत फडणवीसांनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले, या सरकारमध्ये अशाच प्रकारच्या पूजा होऊ शकतात. यापेक्षा वेगळ्या पूजा होण्याची अपेक्षाही आपण करू शकत नाही. उद्या सट्टेवालेही दुसऱ्या एखाद्या मंत्र्याची पूजा करताना दिसले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. पीक कर्जाचा आढावा मी घेतला आहे. खरीप हंगाम सुरू झाला, तेव्हा केवळ १८ टक्के पीक कर्जाचं वाटप झालं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी एसएसबीसीची बैठक घेऊन कडक शब्दांत बॅंकांना सांगितले पाहिजे की, पीक कर्जाचे वाटप झालेच पाहिजे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना टार्गेट देऊन काम केले पाहिजे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात यासंदर्भात जास्त काम केले पाहिजे. विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हा बॅंका अडचणीत सुरू आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अतिरिक्त निधी देऊन पीक कर्जाचे वाटप करण्याची गरज आहे.
आम्ही जो सांगत होतो, तो हाच घोटाळा…
तांदुळामध्ये १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप रेशन संघटनेने केला आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात आपण डीसीपीची पद्धत स्वीकारली आहे. या पद्धतीत महाराष्ट्र सरकार केंद्राच्या वतीने तांदुळ विकत घेते आणि आपल्या राज्यातलाच तांदुळ आपल्या रेशनमध्ये जातो. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये तांदुळाचा घोटाळा जो आम्ही आत्तापर्यंत सांगत आलो आहे, तो हाच घोटाळा आहे आणि याचे धागेदोरे फार वरपर्यंत गेले असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
ज्यांनी सहकाराचा स्वाहाकार केला ते घाबरतील
सहकार खाते आता अमित शहा यांच्याकडे आहे. सहकार कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर राजकारणात आले. सहकार क्षेत्राचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे ज्या लोकांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगले काम केले, त्यांना घाबरण्याचे अजिबात कारण नाही. पण ज्यांनी सहकाराचा स्वाहाकार केला, ते मात्र आता घाबरतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.