भोकरदन ः भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील खासदारांची एक बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे या देखील उपस्थित होत्या. (BJP MPs from Maharashtra at Danve's bungalow) मोदी सरकारमधील मंत्रीमंडळ विस्तारानंतर राज्यातील खासदारांची अशी ही पहिलीच बैठक आणि स्नेहमिलन होते. अर्थात या कार्यक्रमाचे यजमानपद केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वीकारल्यामुळे केंद्रातील मंत्री, खासदार व नेत्यांचा त्यांच्याच बंगल्यावर पाहुणचारही करण्यात आला.
सध्या रावसाहेब दानवे यांचा बंगला भेटायला आणि शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हितचिंतकांच्या गर्दीने फुलून गेलेला आहे. (Central State Railway Minister Raosaheb Danve, Dehli) या बैठकीच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनाही भाजपच्या नेते मंडळींसोबत भोजनाचा आणि भेटीचा योग आला. काल राज्यातील सर्वच महत्वाचे नेते दिल्लीत असल्यामुळे राज्यभरात विविध चर्चांना उधाण आलेले होते. प्रदेशाध्यक्ष बदलापासून ते सत्तेतील उलथापालथ इथपर्यंतचे अंदाज वर्तवले गेले. पण अद्याप तरी तसे काहीही घडलेले नाही.
संघटनात्मक चर्चा आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सगळे नेते रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर होते. श्रावण महिना आणि पहिला सोमवार असल्यामुळे दानवे यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. दुपारी उपवासाचे खाद्यपदार्थ, फळे, ज्युस, ड्रायफ्रुट्स तर संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीचे साधे जेवण होते. बैठकीनंतर अनेक नेते गप्पांमध्ये रंगलेले देखील पहायला मिळाले.
गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील रावसाहेब दानवे यांचे निवासस्थान, महाराष्ट्र सदन, रेल्वे भवनाचे गेस्ट हाऊस त्यांच्या समर्थकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ताच्या जीवाची दिल्ली व्हावी, यासाठी दानवेंकडून त्यांची सरबराई सुरू आहे. असे प्रेम आणि पाहुणचार पाहून त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांचा उत्साह अजूनच वाढला आहे.
अशातच राज्यातील भाजपचे सगळे खासदार एकत्र जमल्याची संधी हेरून दानवे यांनी या सगळ्यांसाठी दिल्लीत खास महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत आखला होता. या संदर्भात दानवे यांनी विचारले असता, ते म्हणाले राज्यातील भाजपच्या खासदारांचे हे दिल्लीतील पहिलेच स्नेहमिलन होते. संघटनात्मक बैठकीनंतर सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती.
श्रावण आणि श्रावणातला पहिला सोमवार असल्याने खास महाराष्ट्रीयन पद्धतीचे साधे जेवण होते. सगळ्यांनी श्रावणी सोमवार इथेच सोडला. या निमित्ताने दिल्ली मला भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांचीही दिल्ली आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांची भेट आणि ओळख तर झालीच, पण त्यांच्या सोबत भोजनाचा योग आल्याने त्यांचा आनंद देखील द्विगुणीत झाला.
पाच हजाराहून अधिक हितचिंतक आले..
केंद्रात रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला भेटायला येणाऱ्यांची गर्दी काही केल्या कमी होत नाहीये, यासंदर्भात विचारले असता, कार्यकर्त्यांचे माझ्यावर असलेले हे प्रेम आहे. दिल्लीत मला भेटण्यासाठी येणाऱ्याची गैरसोय होऊ नये याची मी स्वःत काळजी घेतो. त्यामुळे मंत्री झाल्यापासून आतापर्यंत मला दिल्लीत येऊन भेटणाऱ्यांची संख्या पाच हजार ४०० झाली असल्याचेही दानवे यांनी सांगितले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.