नागपूर : आजची कॉंग्रेस म्हणजे पडक्या हवेलीच्या जमीनदारासारखी दिसते, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार NCP Leader Sharad Pawar यांनी केले होते. त्यावर काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिली. मात्र ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली, त्यांनीच त्यावर डाका घातला किंवा चोरी केली, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असे तर शरद पवार यांना म्हणायचे असेल ना, असा प्रश्न करीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of Congress Nana Patole यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
२०२४ मध्ये पंतप्रधान कॉंग्रेचाच..
नाना पटोले म्हणाले, दुसऱ्या पक्षाबाबत त्यांनी विनाकारण प्रतिक्रिया द्यायला नको. पवारांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांनी काहीशी नाराजीही व्यक्त केली. एवढेच नाही तर २०२४ ला पंतप्रधान काँग्रेसचाच होणार, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला. शरद पवार हे सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये होते. पुलोदचा प्रयोग आणि त्यानंतर काही वर्षांनी सोनिया गांधींना विरोध दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेसची केलेली स्थापना, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला ठाऊक आहेत. कदाचित नाना पटोले यांचा अंगुलीनिर्देशही त्याकडे असावा असा याचा अर्थ घेतला जात आहे.
त्यांच्याबद्दल फार बोलणार नाही..
शरद पवार हे राजकारणातले दिग्गज नेते आहेत. त्यांच्या वक्तव्याबाबत मी फार काही म्हणणार नाही. मात्र काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिली आणि त्यांनीच त्यावर डाका घातला, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाणला. एका मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी आजची काँग्रेस म्हणजे पडक्या हवेलीच्या जमीनदारासारखी असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत.
काय म्हणाले होते शरद पवार ?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कॉंग्रेसबद्दल म्हणाले होते की, उत्तर प्रदेशातील जमीनदारांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आणि राजवाडे होते. परंतु कमाल जमीन धारणा कायदा आल्यामुळे त्यांच्याजवळील जमिनी गेल्या आणि राजवाडे किंवा हवेली तेवढ्या शिल्लक राहिल्या. आता आपल्या हवेलीची डागडुजी करण्याचीही ताकद जमीनदारांची राहिली नाही. त्यांच्याकडे आता केवळ १० ते १५ एकर जमिनी आहेत. परंतु त्यांना वाटते की, हे समोर दिसणारे शेतांमधील पीक आपलेच आहे, अशी अवस्था आज कॉंग्रेस पक्षाची झाली आहे.
आम्ही एकच आहोत, आमच्यात कुठलीही कुरबुरी नाही. महाविकास आघाडीतील नेते एकीच्या कितीही बाता करीत असले तरी त्यांच्या बेबनाव आहे. हे अशा घटनांवरून दिसून येते. कधी शिवसेना-कॉंग्रेस, कधी राष्ट्रवादी-सेना, तर कधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात कशा ना कशावरून तरी कुरबुरी सुरू असतात. असे असले तरी तिन्ही पक्षांचे नेते राज्य सरकारवर मात्र भक्कम पकड ठेवून आहेत. त्यामुळेच की काय, आमच्यात काहीही असले तरी विरोधकांचे (भाजप) ईप्सित कधीही साध्य होऊ देणार नाही, असे महाविकासचे नेते ठामपणे सांगतात.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.