नाशिक : कोणी एका पक्षाने जातीपातीचा वाद वाढविला म्हणणे चुकीचे आहे. शरद पवार यांनी तर कुठल्याही जातीवर अन्याय केलेला नाही. प्रत्येकांना त्यांनी न्याय दिला आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यायची भूमिका त्यांनीच घेतली होती. त्यामुळे सर्व जातींना बरोबर घेऊन चालणे व त्यांना पुढे आणणे म्हणजे जातीपातीचे राजकारण करणे नव्हे, असे स्पष्ट मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरेंसह इतरांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवाद आल्याची टीका झाली होती. याला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले,
हजारो वर्षांपासून जातीपातीचा विषय आपल्या देशात आहे. फुले, शाहू आंबेडकर या सर्वांनी जाती अंतासाठी प्रयत्न केले. पण लोक जातीच्या बाहेर पडण्यास तयार नाहीत. हे सगळ्याच क्षेत्रात आहे. त्यामुळे कोणी एका पक्षाने जातीवाद वाढविला म्हणणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. भूजबळ म्हणाले, शरद पवार यांनी तर कुठल्याही जातीवर अन्याय केलेला नाही. त्यांनी प्रत्येकाना न्याय दिला आहे. ओबीसी आरक्षण पवार साहेबांनी सुरू केले. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यायची ही भूमिका ही शरद पवार यांनीच घेतली होती. सर्व जातींना बरोबर घेऊन चालणे व त्यांना पुढे आणणे म्हणजे जातीपातीचे राजकारण नव्हे, त्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये पहिल्यांदा कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्या एक हजारच्या खाली आलेले आहेत. तरी धोका कायम असून बेड संख्या आणि ऑक्सिजन साठा मुबलक आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर एक हजार बेडची अतिरिक्त व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे 12 टक्क्यांनी पाणीसाठा वाढलाय. तरी देखील अद्याप मुसळधार पावसाची अपेक्षा कायम आहे. पूर्वेकडील धरणे अजून कोरडी असून पुरेसा साठा निर्माण झाला नसल्याने अजूनही चिंतेचा वातावरण आहे.
मराठा आरक्षणांसंदर्भात विचारले असता, मराठा आरक्षणाची तारीख येत्या 24 तारखेला सर्वोच्च न्यायालयात लागली आहे. आम्ही अपील केलेले आहे. काही अडचणी बाबत मी कपील सिब्बल साहेबांना भेटून सांगणार असून ते सर्वोच्च न्यायालयात यावर भाष्य करतील. त्यानंतरच मी या प्रश्नावर बोलेन असे श्री.भुजबळ यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट दिल्यानंतर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धिकरण करण्यात आले, याविषयची विचारले असता ते म्हणाले, मुळात मातोश्रीवरून कोणालाही काहीही सांगण्यात आलेले नव्हते.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही कोणालाही येऊ देणार नाही, असे सांगितले होते. बाळासाहेब ठाकरे हे एक मोठे नेते होते. त्यांच्या स्मारकावर कोणीही जाऊ शकते, त्यामुळे मातोश्रीवरून स्मारकाचे शुद्धिकरण करण्यासाठी कोणीही सांगितले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी सेनाही तालिबानी मानसिकेतची आहे, अशी टीका केली आहे, याविषयी विचारले असता श्री. भुजबळ म्हणाले, तालिबानबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलू देत. तालिबान चांगला की वाईट हे पंतप्रधानांनी ठरविल्यावर मग आम्ही ठरवू काय बोलायचे ते असे त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.