फडणवीस, प्रसाद माफी मागा अन् रश्‍मी शुक्‍लांची चौकशी करा!  

बेकायदा फोन टॅपिंग प्रकणारवरुन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि रविशंकर प्रसाद यांना लक्ष्य केले आहे.
hasan musrif demands apology from devendra fadnavis and ravi shankar prasad
hasan musrif demands apology from devendra fadnavis and ravi shankar prasad

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी बेकायदा फोन टॅपिंगचा आधार घेऊन राज्य सरकारवर आरोप केले आहेत. या खोट्या आरोपांनी महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली आहे. त्यामुळे फडणवीस आणि प्रसाद यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. बेकायदा फोन टॅपिंग करणाऱ्या व अपक्ष आमदारांना भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्‍मी शुक्‍लांची चौकशी करावी आणि त्यांच्या फोनचे सीडीआर अहवाल मागवावेत, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, आयपीएस अधिकारी रश्‍मी शुक्‍ला यांनी बेकायदा फोन टॅपिंग केले. यामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची माहिती मिळवून त्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. आठ महिन्यांपूर्वी सादर झालेल्या अहवालाची  माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशी मिळाली? शुक्‍ला यांच्या माहितीच्या आधारेच फडणवीस यांनी थयथयाट करत हा विषय दिल्लीपर्यंत नेला आणि राज्य सरकारवरही आरोप केले. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही याच आधारे आरोप केले. 

राज्य सरकारचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्‍ला प्रकरणी चौकशी करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अहवाल सादर केला आहे. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, कुंटे यांच्या अहवालानुसार बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या या पोलीस आस्थापना विभागाच्या शिफारशीनेच झाल्या. यातील केवळ काही बदल्या आस्थापना शिफारशी बाहेरच्या होत्या. त्यामुळेच फडणवीस यांनी केलेले आरोप हे तकलादू व लवंगी फटाक्‍यासारखे असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच आता फडणवीस आणि प्रसाद यांनी खोट्या आरोपाबददल राज्याच्या जनतेची माफी मागावी. 

विधानसभेचा निकाल 24 ऑक्‍टोबर 2019  रोजी लागल्यापासून 24 नोव्हेंबर 2019 पर्यंत म्हणजे सरकार स्थापन होईपर्यंत रश्‍मी शुक्‍ला या अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या. यासाठी अनेक अधिकाऱ्यांना कामाला लावले होते. राज्यमंत्री यड्रावकर यांनी याला दुजोरा दिला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर शरद पवार यांच्यासमोरही उघड केली होती. अपक्ष आमदारांना शुक्‍ला या भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर देत होत्या, आरोप मुश्रीफ यांनी केला. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या पोस्टींग झाल्या आहेत. त्यामुळे असे अधिकारी फडणवीस यांच्यासाठी काम करत आहेत. राज्यात भाजपची सत्ता येण्यासाठी त्या प्रयत्न कराव्यात. आयपीएस अधिकाऱ्यांनी अशा कामात सहभाग घेणे हे गंभीर आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांनी केलेल्या फोन प्रकरणाची चौकशी करावी. याबाबतचे सीडीआर जप्त करुन शुक्‍ला यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही मुश्रीफ यांनी केली. 

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्‍कम आहे. हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून सुरु आहे. मात्र, त्यांना यात यश आलेले नाही. त्यामुळे फडणवीस यांनी आता राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचे प्रयत्न सोडून द्यावेव, असे मुश्रीफ म्हणाले. 

तपास भरकटवण्यासाठी प्रयत्न 
अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणे व मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास व्हायलाच हवा. या घटनांच्या मागे कोण आहे, याची माहिती समोर येणे गरजेचे आहे. मात्र, यावरील लक्ष विचलित करणे व तपास भरकटवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. एटीएसने हा तपास केला असता तर खरे मास्टरमाईंड दोन दिवसांत समोर आले असते. तसे होताना दिसत नाही. मात्र केंद्राच्या सुचनेनुसार राज्यात काम सुरु आहे, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com