भाजपचे जहाज आता बुडू लागले आहे...

भाजपच्या राजवटीमध्ये राज्यकारभार ढेपाळला असून, या मुद्द्यावर लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून वारंवार राष्ट्रवादाचे कार्ड पुढे केले जात आहे.
भाजपचे जहाज आता बुडू लागले आहे...

नवी दिल्ली : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि मित्रपक्षांमधील संबंधांमध्ये अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी आज भाजप नेत्यांवर निशाणा साधला. भाजपचे जहाज आता बुडू लागले असून, वारे नेमके कोणत्या दिशेने वाहते आहे हे मित्रपक्षांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सोरेन यांनी नमूद केले.

हेमंत सोरेने हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री असून, झारखंड मुक्ती मोर्चाचे ते कार्यकारी अध्यक्षदेखील आहेत. भाजपच्या राजवटीमध्ये राज्यकारभार ढेपाळला असून, या मुद्द्यावर लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून वारंवार राष्ट्रवादाचे कार्ड पुढे केले जात आहे. आता राज्यातील निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरच होईल. भूसंपादन आणि बेरोजगारीचा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत. ही लोकसभेची नाही, तर विधानसभेची निवडणूक असून, ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरच लढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक आदिवासींच्या हक्कांबाबत राज्याच्या निवडणुकीत बोलायचे नाही, तर मग कोठे बोलायचे, प्रत्येकवेळी राष्ट्रवादाचा मुद्दा कसा काय पुढे नेता येईल, मग लोकांचे प्रश्‍न कधी मांडायचे, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्तास्थापनेवरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा तणावामुळे हे दोन्ही पक्ष परस्परांपासून दुरावले होते. शिवसेनेच्या रोजच्या वाग्बाणांमुळे घायाळ झालेल्या दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी अखेर आज युतीच्या काडीमोडावर शिक्कामोर्तब केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनीच राज्यातील युतीचा संसार मोडल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे खासदार आता विरोधी बाकांवर बसतील, असे सूचक वक्तव्य भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी केले.

दुसरीकडे, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आपल्याला, "महाराष्ट्र में सब कुछ जल्दही ठीक होगा, आप चिंता मत करो,' असे सांगितल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांना सांगितले. शिवसेना दोन्ही कॉंग्रेसबरोबर गेली, तर ते सरकार टिकणार नाही व मुळात कॉंग्रेसच शिवसेनेबरोबर जाणार नाही, असेही भाकीत त्यांनी केले. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय स्थिती त्वरित संपली पाहिजे. कारण, शेतकरी मरत आहे, अशा शब्दांत आठवले यांनी थेट मोदींनाही साकडे घातले.
संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्पक्षीय बैठकीनंतर शब्दांचा खेळ करताना "युती तुटली' असे थेट न सांगता, "शिवसेना खासदारांसाठी विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था केली जात आहे,' असे सांगून युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. सकाळी सर्वक्षीय बैठक, दुपारी एनडीए घटकपक्षांची बैठक; तर संध्याकाळी राज्यसभेतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आणि या तीन बैठकांमध्ये नेत्यांच्या छोट्या-मोठ्या बैठकांचे सत्र संध्याकाळपर्यंत सुरूच राहिले. मात्र, सर्वांचे लक्ष होते शिवसेनासोबतची युती तोडण्याबाबत भाजप काय भूमिका घेते याकडे. जोशी यांनी ही संदिग्धता दूर केली व आता शिवसेनेचे राज्यसभेतील तिन्ही व लोकसभेतील 18 खासदार विरोधी बाकांवर बसतील, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com