नवी दिल्ली : पेगॅसस (Pegasus) प्रकरणावर राज्यसभेत काल गदारोळ उडाला होता. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) बोलत असतानाच तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार शंतनू सेन (Santanu Sen) यांनी त्यांच्या हातातील निवेदन हिसकावून घेत फाडले. त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी सेन यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, सेन यांनी बाहेर जाण्यास नकार दिल्याने राज्यसभा तहकूब करण्यात आली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस प्रकरण बाहेर आल्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. लोकसभेत वैष्णव यांनी याबाबत पहिल्याच दिवशी निवेदन केले होते. तर राज्यसभेत निवेदन सादर करण्यासाठी तृणमूलसह इतर विरोधी पक्षांचे खासदार सभागृहातील सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले होते.त्यानंतर वैष्णव यांनी सभागृहात निवेदन देण्यास सुरूवात केल्यानंतर शंतनू सेन यांनी त्यांच्या हातातील निवेदन हिसकावून घेतले. सेन यांनी ते निवेदन फाडत ते भिरकावून दिले. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला.
या गोंधळामुळं वैष्णव यांना आपलं निवेदन पूर्ण करता आले नाही. त्यांनी थोडक्यात बोलत हेरगिरीचे आरोप धुडकावून लावले. आज राज्यसभेचे कामकाज सुरू होताच संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी सेन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दाखल केला. लगेचच अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी सेन यांना पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित केले. निलंबन झाल्यानंतर सेन हे सभागृहाबाहेर गेले नाहीत. नायडू यांनी सेन यांना बाहेर जाण्याची विनंती केली. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध करण्यास सुरवात केली. अखेर नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज काही काळासठी तहकूब केले.
राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पेगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या यादीत खुद्द वैष्णव यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी, अशोक लवासा, महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश आहे.
इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसस स्पायवेअर तयार केला आहे. पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी ही बाब उघडकीस आणत ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच तयार केली. ही माहिती त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना दिली. या यादीनुसार शोध घेतल्यानंतर ५० देशांमधील एक हजारांहून अधिक जणांवर पाळत ठेवल्याबाबतचे पुरावे मिळाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.