वर्षभरानंतर उलगडणार सुशांतच्या मृत्यूचे गूढ? फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष होत आले आहे. या प्रकरणाचे गूढ आता उलगडण्याची शक्यता असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्राला अटक करण्यात आली आहे.
NCB arrests Sushant Singh Rajput flatmate Siddharth Pithani from Hyderabad
NCB arrests Sushant Singh Rajput flatmate Siddharth Pithani from Hyderabad

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला एक वर्ष होत आले आहे. प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. आता सुशांतसोबत त्याच्यासोबत राहणारा मित्र सिद्धार्थ पिठाणी (Siddharth Pithani) याला अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) अटक केली आहे. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याची शक्यता व्यक्त आहे. 

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी फ्लॅटमध्ये उपस्थित असणाऱ्या व्यक्तींमध्ये सिद्धार्थचा समावेश आहे. सीबीआय आणि सक्त वसुली संचालयानेही (ईडी) आधी त्याची चौकशीही केली होती. तो सुशांतचा फ्लॅटमेट होता. सुशांत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज अँगलमध्ये सिद्धार्थ हा महत्वाचा संशयित होता. त्याला एनसीबीने वारंवार समन्स बजावले होते. परंतु, तो उत्तर देत नव्हता आणि चौकशीलाही येत नव्हता. मागील काही दिवसांपासून एनसीबीकडून  त्याचा शोध सुरू होता. अखेर सिद्धार्थ  हा हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. एनसीबीच्या पथकाने हैदराबादमधून त्याला ताब्यात घेतले.

हैद्राबाद न्यायालयात सिद्धार्थला हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी  सुनावली आहे. सिद्धार्थच्या घरात  आक्षेपार्ह इलेक्ट्रॉनिक्स पुरावे सापडले आहेत. आता पर्यंत तीन वेळा सिद्धार्थला समन्स बजावण्यात आले होते. सुशांत प्रकरणातील ही ३५ वी अटक आहे. सुशांतच्या ड्रीम टीममध्ये सिद्धार्थ प्रमुख होता. सुशांतला  तोच अंमली पदार्थ पोहोचवत होता, असा आरोप त्याच्यावर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांत हा 14 जूनला त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. 

या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com