बंगळूर : पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी नुकताच मंत्रिमंडळ विस्तार केला होता. नंतर मंत्रिमंडळ विस्तारावरुनही गदारोळ झाला होता. भाजपच्या काही आमदारांनी उघड बंडाची भाषा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच (आरएसएस) येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदी नको असून, त्यांची गच्छंती होणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री 16 जानेवारीला कर्नाटक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शहा म्हणाले होते की, राज्यात बी.एस.येडियुरप्पा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार असून, राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. पुढील निवडणुकीत आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. काँग्रेस नेते राज्यात काय-काय घडणार याची चर्चा करीत आहेत. परंतु, असे काही घडणार नाही. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल.
यावर काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमित शहा कितीही म्हणत असले तरी येडियुरप्पांचा कार्यकाळ पूर्ण होणार नाही. ते मुख्यमंत्रिपदी कायम राहणार नाहीत. एप्रिलमध्ये येडियुरप्पांचा गच्छंती होऊन नवीन मुख्यमंत्री बसवला जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच आता येडियुरप्पा नकोसे झाले आहेत.
कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम होते. यामुळे अनेक नेते नाराज होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले असून, ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत होते. सध्या मंत्रिमंडळात 27 मंत्री असून, एकूण क्षमता 34 पर्यंत वाढवता येऊ शकते. अखेर मंत्रिमंडळ विस्तार येडियुरप्पांनी जाहीर केला होता. एमटीबी नागराज, उमेश कत्ती, अरविंद लिंबावली, मुरूगेश निरानी, आर. शंकर, सी.पी.योगेश्वर, अंगारा एस. यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांचा नुकताच शपधविधी झाला आहे.
नव्याने मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेस आणि जेडीएस सोडून भाजपमध्ये आलेल्या एम.टी.बी.नागराज आणि आर.शंकर यांचा समावेश आहे मात्र, मुनिरत्न यांचा समावेश नाही. याचवेळी येडियुरप्पांनी अपक्ष आमदार आणि उत्पादन शुल्क मंत्री एच.नागेश यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. त्यांच्या जागा भरणार की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
मंत्रिमंडळ विस्तारावरुन भाजपमध्ये अनेक आमदारांना बंडाचे निशाण फडकावले आहे. यात आमदार बसनगौडा पाटील-यतनाळ आघाडीवर आहेत. त्यांनी म्हटले होते की, येडियुरप्पा यांनी आता राजकीय संन्यास घ्यावा. ब्लॅकमेल करणारे आणि पैसे देणारे अशांना मंत्रिपद देण्यात येत आहे. मंत्रिपदासाठी आता ब्लॅकमेलिंगची सीडी आणि पैसा असे दोन कोटा आहेत. येडियुरप्पा यांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले जात आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.