नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद सुरूच आहे. पंजाबध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांचे बंड यशस्वी झाल्यानंतर आता पायलट यांनी हाय कमांडला इशारा दिला आहे. पायलट यांनी आता पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.
मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अज माकन हे नुकतेच राज्यात दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.
पायलट म्हणाले की, राजस्थानबाबत अनेक मुद्दे मी उपस्थित केले होते. त्यावर पक्ष नेतृत्वाकडून सविस्तर चर्चा झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समिती सरकार आणि पक्ष संघटनेच्या भल्यासाठी आता पावले उचलणार आहे. मी सातत्याने हाय कमांडच्या संपर्कात आहे. हाय कमांड योग्य ती पावले उचलेल, अशी आशा मला आहे.
राज्यात काँग्रेस सत्तेत राहील, याची जबाबदारी पक्षाच्या नेत्यांवर आहे. याबद्दल मी काही सूचना केल्या आहेत. पक्षाला जास्तीत जास्त योगदान देणाऱ्या नेत्यांना त्याच्या परिश्रमाप्रमाणे राजकीय बक्षीस मिळायला हवे. हे फक्त पदापुरते नसते. आपल्याला काँग्रेसच्या कुटुंबाचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे नवीन लोकांना पक्षाशी जोडायला हवे, असे पायलट यांनी नमूद केले. पायलट यांनी पक्षाला हा सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.
पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला होता. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.
पायलट यांनी बंड केले त्यावेळी काँग्रेसला साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट आणि 18 आमदार दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. काँग्रेस नेतृत्वाने विविध मागण्यांवर कार्यवाही करण्याचा शब्द दिल्यानंतर पायलट यांच्यासह काँग्रेस आमदार पक्षात परतले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.