नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षात (LJP) फूट पाडणारे केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांना पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन चिराग यांनी जबरदस्तीने हटवले, असा गौप्यस्फोट पारस यांनी केला आहे.
पशुपतीकुमार पारस म्हणाले की, रामविलास पासवान यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याची इच्छा नव्हती. तरीही चिराग यांनी त्यांना पदावरुन हटवले. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाची बिहारमध्ये चांगली कामगिरी होती. असे असतानाही चिरागने मला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले. माझी काय चूक होती म्हणून मला ही शिक्षा मिळाली. चिरागने तर मला काका मानण्यासही नकार दिला. आमच्या दोघांचे रक्त एक नसल्याचेही तो म्हणाला होता. आता मला चिरागसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत.
नितीशकुमार यांना विकासपुरूष म्हटल्याने मला पक्षातून काढण्याची धमकी चिरागने दिली होती. बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना तुरुंगात पाठवणार, असे चिराग म्हणाला होता. नितीशकुमारांनी काय केले म्हणून तू त्यांना तुरुंगात टाकणार, अशी विचारणा मी केली होती. पक्षाच्या सर्व खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, चिरागने कुणाचेही ऐकले नाही. पक्ष वाचवण्यासाठी अखेर मला एनडीएतील सहयोगी पक्षांचे सहकार्य मिळाले. चिरागने संपूर्ण पक्षाची वाट लावली. मला आता त्याच्याशी कोणतेही संबंध नको आहेत. केवळ हाजीपूर नव्हे तर संपूर्ण बिहारची जनता माझ्यासोबत आहे, असे पारस यांनी सांगितले.
लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पारस हे बंधू आहेत. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे पक्षाची धुरा सांभाळत आहेत. चिराग यांच्याविरोधात पारस यांनी उघड बंड पुकारले होते. लोक जनशक्ती पक्षातील या फुटीमागे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत चिराग यांच्यामुळे नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाला मोठा फटका बसला होता. यामुळे चिराग यांच्याविरोधात नितीशकुमारांची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यांनी 7 जुलैला शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होता. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या होत्या. यामध्ये पासवान यांच्या जागेवर त्यांचे बंधू पारस यांना संधी दिली होती. परंतु, चिराग पासवान यांनी त्यावर आक्षेप घेतला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.