नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. तीन पिढ्यांपासूनचा काँग्रेसशी असलेला संबंध आज संपला, अशी भावना प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्रू पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत प्रसाद यांनी प्रवेश केला. हा प्रवेशाचा कार्यक्रम दिल्लीत पक्ष मुख्यालयात झाला. त्याआधी त्यांनी भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. दरम्यान, आज सकाळी काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असे ट्विट खासदार व पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बालुनी यांनी केले होते. यामुळे मोठी चर्चा सुरू झाली होती. अखेर प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
या वेळी बोलताना प्रसाद म्हणाले की, माझा तीन पिढ्यांपासून भाजपशी संबंध आहे. यामुळे खूप विचार करुन हा निर्णय घेतला आहे. मागील 8 ते 10 वर्षे मला वाटत होते की राष्ट्रीय पक्ष असा एकमेव पक्ष असून, भाजप आहे. बाकीचे पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत. देशहितासाठी उभे राहणारा राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांचा विचार केल्यास भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच नाव घ्याव लागते.
तुम्हाला लोकांच्या हिताचे संरक्षण आणि त्यांच्यासाठी काम करता येत नसेल तर एखाद्या पक्षात राहण्यास कोणतेही कारण उरत नाही. मला काँग्रेसमध्ये हे करता येत नव्हते. मला साथ दिल्याबद्दल काँग्रेसमधील सर्वांचे मी आभार मानतो. एक कटिबद्ध भाजप कार्यकर्ता म्हणून यापुढे मी काम करीत राहीन, असे प्रसाद यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते.
पायलट यांचेही केले होते समर्थन
राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची पक्षाने उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. पायलट यांचे बंड अखेर चहाच्या पेल्यातील वादळ ठरले होते. त्यावेळीही जितिन प्रसाद यांनी पायलट यांची उघड बाजू घेतली होती. पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्याने त्यावेळी आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
Edited by Sanjay jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.