भाजपचा बडा नेता करणार पक्षाला रामराम? बैठकीला मारली दांडी

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर राज्यातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे उपाध्यक्ष खासदार मुकुल रॉय यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे.
BJP leader and mp mukul roy skips party meet in kolkata
BJP leader and mp mukul roy skips party meet in kolkata

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपमध्ये (BJP) अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे उपाध्यक्ष खासदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रॉय यांना थेट फोन करुन चर्चा केली होती. तरीही रॉय यांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारल्याने त्यांच्या तृणमूल प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. 
 
भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाची बैठक कोलकत्यात बोलावली होती. या बैठकीला रॉय यांनी दांडी मारली. मागील काही दिवसांपासून रॉय यांनी मौन धारण केले आहे. सार्वजनिकरीत्या त्यांनी कोणतेही विधान केलेले नाही. मात्र, रॉय यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी रॉय हे तृणमूलमध्ये परततील, ही शक्यता नाकारलेली नाही. 

याच पार्श्वभूमीवर बंगालमधील भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी 8 जूनला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली होती. भाजपला आगामी काळात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याचमुळे अधिकारींना तातडीने दिल्ली गाठून शहांशी चर्चा केली. आता भाजपचे खासदार सौमित्र खान आणि खासदार अर्जुनसिंह हे सुद्धा दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे केंद्रीय नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली आहे.  

मुकुल रॉय यांच्या पत्नी आजारी असून, कोलकत्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. नंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच थेट रॉय यांनी दूरध्वनी करुन त्यांच्याशी चर्चा केली होती. मोदी आणि रॉय यांच्यात काही मिनिटे संवाद झाला. रॉय यांच्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल मोदींनी विचारपूस केली. त्यांच्यात राजकारणाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, अशी भाजपमधील सूत्रांनी दिली होती. 

नाराजीचे कारण सुवेंदू अधिकारी  
तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले नेते सुवेंदू अधिकारी यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे रॉय हे नाराज आहेत, अशी चर्चा आहे. ममतांच्या कोअर टीममध्ये सुरवातीला रॉय होते. त्यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दोनच वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बंगालमध्ये 42 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या. या विजयाचे श्रेय रॉय यांनाच दिले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com