नागपूर : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमध्ये शिवसैनिक ठेकेदारांकडून पैसे मागतात, त्यामुळे कामे करायची कशी, असा प्रश्न विचारणारे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांना पाठवले. या पत्रावरून चांगलीच खळबळ उडाली आहे. अशात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of Congress Nana Patole गरजले आणि म्हणाले की, गडकरींना दाढीवाल्यानं सांगितलं का आरोप करायला ?
आज येथे कॉंग्रेस पक्षाच्या आयोजित ‘व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर पटोले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी गडकरींनी कधी सेनेवर टीका, आरोप केले नाहीत. आज मात्र ते पत्र लिहून सेनेवर आरोप करत आहेत. त्यांना वरून दाढीवाल्यानं सांगितलं का आरोप करायला, असा खोचक सवाल नाना पटोले यांना केला. महामार्गाच्या कामांमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार असल्याची अनेक पत्रे त्यांच्या मंत्रालयाला दिली आहेत. त्याची चौकशी आणि एक श्वेतपत्रिका गडकरी यांनी काढावी, अशी मागणीही पटोलेंनी केली. महामार्गाची कामं झाली पाहिजे आणि जर या कामांत कुणी अडथळा आणत असेल, काँग्रेस पक्ष त्यांना विरोध करेल, असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा : उद्धवजी तुमचे शिवसैनिक पैसै मागतात, सांगा कामे कशी करायची ?
नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लेटरबॉंम्ब टाकल्यानंतर एकच खळबळ उडाली. या पत्रामध्ये त्यांनी शिवसैनिकांवर पैसे मागितल्याचा आरोप केला. चांगली सुरळीत सुरू असलेली कामेही शिवसेनेचे पदाधिकारी थांबवीत असल्याचा गंभीर आरोप गडकरींनी पत्रामध्ये केला आहे. हे पत्र माध्यमांमध्ये झळकताच वाशीम येथील शिवसैनिकाने कंत्राटदाराला धमकाविल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. त्यानंतर विविध राजकीय नेत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया आल्या आणि अजूनही येत आहेत. आता नाना पटोले यांनी या पत्रामागचे मास्टरमाईंड पंतप्रधान नरेंद्र मोदी तर नाहीत, अशी शंका उपस्थित करून एक नवीन बॉम्ब फोडला आहे. पटोलेंच्या बोलण्यावर अद्याप काही प्रतिक्रिया आल्या नसल्या तरी गडकरींचा लेटरबॉम्ब देशाच्या राजकारण नवीन वादळ आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम आमच्या मंत्रालय करत आहे. मात्र, वाशीम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशीम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले. मात्र, शिवसेना कार्यकर्त्यांनी मशीनरिची जाळपोळ करून कंत्राटदाराच्या कामगारांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद पडले आहे, असे गडकरींनी पत्रात म्हटले आहे.
ही बातमी पण वाचा : ऑडिओ क्लिप झाली व्हायरल आणि धमकावणाऱ्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश...
मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता लवकरच पूर्ण होईल. या रस्त्याच्या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरूपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाची कामं सुरू आहेत. मेडशी ते वाशीम या पॅकेज-२ मध्ये वाशीम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे.
परंतु, वरील सदर बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील सेनेच्या लोकप्रतिनिधींनी थांबविल्याचे मला सांगण्यात आले आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवायची कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल, असे गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.