नाशिक : तो म्हणाला साहेब शेतक-यांची परिस्थिती कधीच चांगली नसते. म्हणून काय कोरोनाचे संकट आल्यावरही रडत बसायचं? शेतकरी रडतच नाही, रोज परिस्थितीशी लढतोही. याची जाणीव येथील युवा सरपंच देवीदास देवगिरे यांनी पोलिस कल्याण निधीला दिलेल्या एक्कावन्न हजारांचा निधीतून करुन दिली आहे. कोरोनाशा दिवसरात्र रस्त्यावर लढणा-या पोलिसांना पाठींबा देत त्यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे.
पिंपळगाव घाडगा (इगतपुरी) येथील युवा सरपंच देवीदास पोपटराव देवगिरे हे पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या कार्याने प्रेरीत आहेत. त्यासाठी ते सतत काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांविषयी सध्या 'आम्ही बाहेर आहोत त्यामुळे तुम्ही घरीच सुरक्षीत रहा,' हे वाक्य कोरोना संदर्भात सातत्याने बोलले जाते. त्यातूनच प्रेरणा घेऊन श्री. देवगिरे यांनी त्यांच्या शेतातील कांदे आणि सर्व भाजीपाल्याच्या पिकाची विक्री केली. त्यातून त्यांना जवळपास पन्नास हजार रुपये आले. त्यात स्वतःची काही रक्कम जोडून एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश त्यांनी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना सुपूर्द केला.
सुरवातीला त्यासाठी संपर्क केल्यावर सर्व शेतकरी अडचणीत आहेत, त्यांची परिस्थिती अडचणीची आहे, तेव्हा तुम्ही का पैसे देताय? कसे देत आहात? अशी शंका उपस्थित केली गेली. मात्र स्वतः अबोल असल्याने त्याविषयी ते फारसे काही सांगू शकले नाहीत. प्रत्यक्ष हा धनादेश दिल्यावर दुरचित्रवाणीच्या प्रतिनिधींनी बाईट मागीतला. त्यावर देखील गोंधळ झाल्याने ते काही बोलू शकले नाही. मात्र एकंदरच कोरोना संदर्भात रस्त्यावर लढणा-या पोलिसांसाठी आपल्या शेतातील सर्व भाजीपाला विकून त्याचे पैसे कल्याण निधीला देऊन एरव्ही रडणाऱ्यांना मात्र त्यांनी लाजवले एवढे मात्र खरे.
सध्या कोरोना संसर्ग सगळीकडे वाढत आहे. अगदी गावोगावी ग्रामस्थांनी स्वतःच लाॅकडाऊन करुन घेतले आहे. विविध उपाययोजना करु लागले आहेत. त्यामुळे कोरोना विरोधातील लोकशिक्षण खेडोपोडी पोहोचले आहे. यातूनच सरपंच देवगिरे आणि राहूल संपतराव काळे यांनीही विविध उपक्रम केले. सुरवातीला कोबी, फ्लाॅवरचे भाव पडले. तेव्हा शेतात जनावरे सोडल्याच्या बातम्या आल्या. श्री. देवगिरे यांनी मात्र परिसरातील शेतकःयांना समजावले. सर्व कोबी- फ्लाॅवर एकत्र करुन स्वखर्चाने नाशिक रोडला आणला.
लाॅकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या नागरीकांना त्याचे मोफत वाटप केले. पोलिस, लष्कर देशासाठी कार्यरत असते. त्यांना कृतीशील पाठींबा म्हणून त्यानी पोलिस कल्याण निधीला मदत दिली., तसेच नाशिकच्या काॅम्बॅट एवीएशन ट्रेनींग सेंटर (कॅटस) च्या लष्करातील कर्मचाःयांच्या कुटुंबीयांना मोफत भाजीपाला विचरीत केला. यापुर्वी ते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होते. त्यातील कामामुळे गावाला राज्य शासनाने तीन लाखांचा पुरस्कार दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.