मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने या कालावधीत अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि विविध प्रवेश परीक्षा आयोजित केल्यास विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या कुटुंबांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. देशातील ११ राज्यांचे सरकार अंतिम वर्षाच्या आणि विविध प्रवेश परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे देशभरात आता परीक्षांचा मुद्दा चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे कारण देत ठाकरे यांनी या प्रकरणात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.
शैक्षणिक वर्ष जानेवारीमध्ये सुरू करा
आपल्या नेतृत्वात देश कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. यात नागरिकही प्रामाणिकपणे आपले योगदान देत आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने देशातील बहुतांश लोक घरूनच काम करत आहेत. अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ, व्यावसायिक व अव्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचे ठरवत आहेत, परंतु जगभरात जिथे शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आली, तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आपले शैक्षणिक वर्ष जून-जुलै २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, ज्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.