लोकांनी भरभरून मतदान केले, पन्नास हजारांहून अधिक मतांनी विजयी होणार- चंद्रकांत खैरे

सात टप्यातील मतदान पार पडल्यानंतर सगळ्याच एक्‍झीटपोलने देशात पुन्हा एनडीएच्या बहुमताचे सरकार येणार असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील शिवेसना-भाजप युती ३५ ते ४०0 जागा जिंकेल, असे सर्व्हेमधून समोर आले आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले असतांना ही जागा शिवसेना पाचव्यादा जिंकणार असे एक्‍झीटपोल सांगतो आहे.
लोकांनी भरभरून मतदान केले, पन्नास हजारांहून अधिक मतांनी विजयी होणार- चंद्रकांत खैरे

 औरंगाबाद : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून राज्यात शिवसेना-भाजप युती झाली. यामध्ये काही जणांनी मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, आता 23 मे रोजी ते उघडे पडतील. पण लोकांनी देशात मोदी आणि राज्यात युतीकडे पाहून भरभरून मतदान केले आहे. मतमोजणी होईल तेव्हा पन्नास हजार ते एक लाखांच्या मताधिक्‍याने मी विजयी होईन," असा दावा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला. 

सात टप्यातील मतदान पार पडल्यानंतर सगळ्याच एक्‍झीटपोलने देशात पुन्हा एनडीएच्या बहुमताचे सरकार येणार असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील शिवेसना-भाजप युती ३५ ते ४०0 जागा जिंकेल, असे सर्व्हेमधून समोर आले आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले असतांना ही जागा शिवसेना पाचव्यादा जिंकणार असे एक्‍झीटपोल सांगतो आहे. शिवसेनेसाठी ही आनंदाची बाब असली तरी त्यांच्या मराठवाड्यातील परभणी आणि उस्मानाबादच्या जागा 'डेंजर झोन'मध्ये असल्याचे समोर आले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांना विचारले असता ते म्हणाले, ''औरंगाबाद प्रमाणेच परभणी आणि उस्मानाबाद हे शिवसेनेचे गड राहिलेले आहे. यावेळी या दोन्ही मतदारसंघामध्ये काही प्रश्‍न आणि नाराजीचे वातावरण होते ही वस्तुस्थीती होती. पण निवडणुकीच्याआधी यावर पक्षाने उपाययोजना केल्या होत्या. उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले होते. पण शेवटच्या टप्यात शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले. त्याचे चांगले परिणाम २३ मे रोजीच्या मतमोजणीनंतर दिसतील आणि शिवसेना उस्मानाबादची जागा कायम राखेल.'' 

''परभणी मतदारसंघ हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. विद्यमान खासदार संजय जाधव हे माझे चांगले मित्र आहेत. पंढरपूरच्या वारीत पायी जाणारा धार्मिक वृत्तीचा हा माणूस आहे. स्थानिक आमदार आणि त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होते. त्यामुळे परभणीची जागा धोक्‍यात असल्याचे बोलले गेले. पण इथेही आमदार-खासदार यांच्यातील वाद संपुष्टात आणून त्यांच्यात समेट घडवण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले होते. आमदार राहूल पाटील यांच्यांशी माझे बोलणे झाले, तेव्हा त्यांनी संजय जाधव यांच्यासाठी मी व जिल्ह्यातील सगळ्याच शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केल्याचे सांगत परभणीचे खासदार याहीवेळी दिल्लीत तुमच्या सोबत असतील असा विश्‍वास दिला आहे. हिंगोलीची जागा देखील शिवसेना कॉंग्रेसकडून यावेळी खेचल्याशिवाय राहणार नाही,'' आमचे हेमंत पाटील तिथे प्रचंड मतांनी निवडून येतील असा दावा देखील खैरे यांनी केला. 

शिवसेना फॅक्‍टरच चालला.....
''औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात माझ्या विरोधात सगळे राजकीय पक्ष एकत्र आले. पण जिल्ह्यातील मतदार मात्र माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आरोप-प्रत्यारोप, अपप्रचार या सगळ्या गोष्टी विरोधकांनी केल्या. युतीतील काही नेते, पदाधिकाऱ्यांनी देखील मीठाचा खडा टाकण्याचे काम केले. पण जनतेचा भक्कम आशिर्वाद आणि पाठिंबा मला या निवडणुकीतही मिळेल आणि विरोधात काम करणारे उघडे पडतील. औरंगाबाद शहरावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. त्यामुळे कुणी कितीही दावे केले तरी औरंगाबादेत फक्त शिवसेना फॅक्‍टरच चालतो, हे २३ मे रोजी पुन्हा एकदा सिध्द होईल. औरंगाबादेतील मतदारांचे आणि जनतेचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो,'' असे खैरे म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com