खेडमध्ये सुरेश गोरेंचा बार उडणार की फुसका ठरणार?

खेडमध्ये सुरेश गोरेंचा बार उडणार की फुसका ठरणार?

चाकण : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे हे पुन्हा रिंगणात उतरणार, अशी शक्‍यता आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी गावभेट दौरा सुरू केला आहे. त्यांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

गोरे हे दुसऱ्यांदा विजयी होतील, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. पण, त्यांना गड राखणे एवढे सोपे नाही. त्यांना या वेळी निकराची झुंज द्यावी लागणार आहे, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शिवसेना खेडचा गड राखणार की राष्ट्रवादी पुन्हा गड ताब्यात घेणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

गोरे यांनी सन 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केला आणि ते आमदार झाले. त्यांच्या काळात कोट्यवधी रुपयांची कामे केली. तालुक्‍यातील दादागिरी संपविली, असा त्यांचा होरा आहे. पण, तालुक्‍यात उलट दादागिरी औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात वाढली. कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचा आमदार गोरे यांचा दावा फुसका बार असून, त्यांना त्यांच्या घराजवळचे रस्ते करता आले नाहीत. तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्था तीच आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविता आली नाही. मोठ्या शहरांच्या कचऱ्याचा प्रश्‍न सोडविता आला नाही. मराठा आंदोलनाच्या खटल्यातील तरुणांना न्याय त्यांनी दिला नाही. काही तरुणांना केवळ त्यांचे विरोधक म्हणून त्यांनी निष्पाप गोवले, असा आरोप त्यांच्यावर होत आहे.

आमदार गोरे यांच्यावर विरोधक या वेळी तुटून पडून आरोप करणार आहेत, असे चित्र आहे. या आरोपांना ते काय उत्तर देतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यांना मागील वेळी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठी मदत केली. ही मदत या वेळी होणार नसल्याचे उघड होत आहे.

शिवसेना-भाजपची युती झाली नाही, तर शिवसेनेला तालुक्‍यात एकट्याने रथ हाकायचा आहे. भाजपचा उमेदवारही असणार आहे. युती झाली नाही, तर भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख हे उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तालुक्‍यात भाजपचा मेळावा घेतला होता.

तसेच, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिलबाबा राक्षे हेही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसचे माजी उपसभापती अमोल पवार यांनीही निर्धार मेळावा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा प्रयत्न चालविला आहे.

प्रचाराचा मुद्दा असणार निष्क्रियपणा
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे वारे असताना राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी केवळ वीस दिवसांत बाजी मारून विजय खेचून आणला. आढळराव पाटील यांच्या निष्क्रिय कामांवर बोट ठेवून डॉ. कोल्हे व त्यांच्या समर्थकांनी प्रचार केला. तसाच प्रचार माजी आमदार दिलीप मोहिते हे आमदार गोरे यांच्या निष्क्रियपणावर बोट ठेवून करतील व विजयी होतील, असा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सूर आहे.

शिवसेनेतील काही पदाधिकारी व कार्यकर्ते अंतर्गत नाराज आहेत. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शिवसेनेत काही आलबेल नाही, असे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com