निमंत्रण आल्यास काँग्रेसचा प्रचार करणार - यशवंत सिन्हा 

सोमवारी सायंकाळी अमरावती येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला रवाना होण्यापूर्वी नागपुरात पत्रकारांशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर पुन्हा टीकेची झोड उठवली.
Yashwant Sinha
Yashwant Sinha

नागपूर : पुढील महिन्यात होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव अटळ असून काँग्रेसच्या उमेदवारांकडून प्रचाराचे निमंत्रण आल्यास आपण त्यांचा प्रचार करू, असे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी येथे जाहीर केले. 

सोमवारी सायंकाळी अमरावती येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला रवाना होण्यापूर्वी नागपुरात पत्रकारांशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर पुन्हा टीकेची झोड उठवली. ''गेल्या साडे चारवर्षात जनतेला सांगण्यासारखे कोणतेही काम नसल्याने मोदी प्रत्येक भाषणात नेहरू-गांधी परिवारावर टीका करीत आहेत. शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण न देण्याचे किमान शिष्टाचारही ते पाळत नाही. मोदींच्या कार्यशैलीमुळे देशाची अर्थव्यवस्था व स्वायत्त संस्थांचे सार्वभौमत्वही धोक्‍यात आले आहे. गेल्या साडेचार वर्षांत देशाची सर्व क्षेत्रात पिछेहाट झाली आहे.'' असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "2008 मध्ये अमेरिकेतील सर्वात मोठी बॅंक लेहमॅन ब्रदर्स नादारीत निघाल्याने अमेरिकेत अभूतपूर्व आर्थिक संकट आले होते. हीच स्थिती भारतातील बॅंकिंग व्यवस्थेची झाली आहे. जनतेमध्ये असंतोष असून ही नाराजी येत्या लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे." मोदींचा पराभव करण्यासाठी महागठबंधनाची गरज पडणार नसून प्रादेशिक पक्षातील समन्वयातून मोदींचा पराभव अटळ असल्याचा दावाही सिन्हा यांनी केला. 

पुढील महिन्यात राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगना राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. या सर्व राज्यांमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या राज्यातील काँग्रेससह विरोधी पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी निमंत्रण आल्यास आपण जाऊ. देशाला संभाव्य संकटातून वाचविण्यासाठी व देशातील स्वायत्त संस्थांचे रक्षण करण्यासाठी आपण मोदी सरकारच्या विरोधात प्रचार करू, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. 

देशातील सर्वाधिकार पीएमओत एकवटले असून अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री केवळ नावापुरतेच असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "देशातील या चारही मंत्र्यांना कोणतेही अधिकार राहिले नसून नोटाबंदीचा निर्णय अर्थमंत्र्यांना माहित नव्हता, परराष्ट्र व्यवहार मंत्री पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांना भेटू शकत नाही, राफेल सौदा करताना संरक्षण मंत्र्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. जम्मू व काश्‍मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यापूर्वी गृहमंत्र्यांना माहिती दिली जात नाही." यातून पंतप्रधान कार्यालय निरंकुश सत्ता गाजवित असल्याचा आरोप सिन्हा यांनी केला. यावेळी खासदार शत्रुघ्न सिन्हा, खासदार व आपचे नेते संजय सिंग, माजी आमदार व कॉंग्रेसचे नेते डॉ. आशीष देशमुख, प्रशांत पवार उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com