भाजपचे पश्‍चिम बंगालमध्ये  'मिशन 23' यशस्वी होईल का?  

भाजपचे पश्‍चिम बंगालमध्ये 'मिशन 23' यशस्वी होईल का? तृणमूलच्या बालेकिल्ल्यात भाजपला नेमक्‍या किती जागा मिळतील, हेच प्रश्‍न सध्या देशात प्रत्येकाला पडले आहेत.
Modi-Mamata
Modi-Mamata

कोलकाता  : पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बंगाली अस्मितेचा सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींच्या चौफेर हल्ल्याचा सामना करताना देवी दुर्गा, काली माता यांच्या रूपाने तसे संकेत दिले आहेत.

भाजपचे पश्‍चिम बंगालमध्ये 'मिशन 23' यशस्वी होईल का? तृणमूलच्या बालेकिल्ल्यात भाजपला नेमक्‍या किती जागा मिळतील, हेच प्रश्‍न सध्या देशात प्रत्येकाला पडले आहेत. त्याचे उत्तर हे, की भाजपला निश्‍चितपणे दुहेरी आकडा गाठण्याची संधी आहे.'जय श्रीराम' घोषणेची हवा मतदान यंत्रात उतरविण्यासाठी 'बूथ वर्कर' ची फळी जिथे असेल, त्या जागांवर विजयाची शक्‍यता अधिक असेल.

सोळाव्या लोकसभेत दार्जिलिंगमधून केंद्रीय मंत्री एस.एस. अहलूवालिया व आसनसोल येथून दुसरे मंत्री बाबूल सुप्रियो असे भाजपचे दोन खासदार होते. या दोन्ही जागा अडचणीत असल्याचे बोलले जाते. गोरखालॅंड आंदोलनाचा लाभ अहलूवालिया यांना झाला होता. ते आंदोलन ममता बॅनर्जी यांनी मोडून काढले. परिणामी अहलूवालिया यांना मतदारसंघ बदलावा लागला. ते आता वर्धमान- दूर्गापूर मधून लढत आहेत. 

दार्जिलिंगमध्ये भाजपने "त्रिपुरा' प्रयोग केला आहे. दिल्लीतील व्यावसायिक विप्लवकुमार देव यांना जसे त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी बसविण्यात आले, त्याच पद्धतीने दिल्लीतील सूर्या रोशनी कंपनीचे मालक राजू बिश्‍ता यांना दार्जिलिंगचे तिकिट देण्यात आले.बंगालच्या उत्तर भारतातील अलिपूरद्वार, दार्जिलिंग, बालूरघाट अशा काही जागांवर भाजपला अधिक संधी आहे. परंतू त्याही भागात ममता बॅनर्जींनी बंगाली अस्मितेचा हुंकार भरला आहे. 

मतदानाच्या पाच टप्प्यामध्ये जसजसा प्रचार पुढे सरकला तसे भाजपने हिंदुत्व अधिक जवळ केले. कोलकाता, तसेच दक्षिण भागातील हिंदी भाषिक, उत्तरप्रदेश व बिहारमधून पोटापाण्यासाठी बंगालमध्ये आलेल्या लोकांमध्ये भाजपची हवा आहे. रसवंती, पानपट्टी चालविणारे, टॅक्‍सिचालक व अन्य भैय्या, बिहारी लोकांच्या तोंडी भाजपला "बारा ते पंधरा नक्की' अशी भाषा आहे. या हक्‍काच्या मतदारांशिवाय तृणमूल कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या मंडळीसोबत स्थानिक बंगाली मतदार किती जातो, यावर यशाची गणिते अवलंबून आहेत.

राज्यातील 30 ते 32 टक्के मुस्लिम मतदार ही ममता दीदींची व्होटबॅंक आहे. परंतू हाच मुद्दा त्यांच्या विरूद्धही जाण्याचा धोका आहे. अगदी बिनदिक्कतपणे त्यांनी केलेले मुस्लिमांचे लांगूलचालन लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे परंपरागत डावे पक्ष व कॉंग्रेसला मतदान करणारे भाजपकडे वळू शकतात. तृणमूल कॉंग्रेसमध्येही कमी- अधिक प्रमाणात धूसफूस आहे. तिचा फटका काही जागांवर दीदींना बसू शकतो. म्हणूनच अखेरच्या टप्प्यात त्यांनी आक्रमकपणे बंगाली अस्मितेवर फुंकर घालण्याच प्रयत्न चालवला आहे.

सोमवारी, 6 मे रोजी झारग्राम व तामलूक येथील प्रचारसभांमध्ये पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये 'जय श्रीराम' घोषणा देणाऱ्यांना तुरूंगात टाकले जात असल्याचा आरोप केला. विष्णूपूरच्या सभेत ममता बॅनर्जी यांनी बंगाली जनता जयदुर्गा, जय कालीमाता म्हणेल. भाजपला हवे म्हणून 'जय श्रीराम' च्या घोषणा कशाला देईल, असा प्रश्‍न केला. त्याशिवाय दोन्ही नेत्यांनी अनुक्रमे खंडणीवसुली व गुजरात मधील रक्तपाताचे हातावर डाग, असे आरोपही प्रतिस्पर्ध्यांवर केले.


काळ्या झेंड्या ऐवजी 'जय श्रीराम' !
भाजपने हवा बनविलेल्या 'जय श्रीराम' घोषणेबद्दल एका ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितले, की हे आधीच्या काळ्या झेंड्यांचे नवे रूप आहे. यापूर्वी विरोधी विचारांच्या नेत्यांचा ताफा जात असताना रस्त्याच्या कडेला लोक काळे झेंडे दाखवायचे. आता विशेषत: तृणमूलच्या नेत्यांना ऐकू जाईल, अशा 'जय श्रीराम' च्या घोषणा दिल्या जातात.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com