आधी नरेंद्र, नंतर देवेंद्र ही घोषणा फडणवीस यांच्या अंगाशी?

भाजपचे चाणक्यसमजल्या जाणाऱ्या अमित शहा यांना सत्ता स्थापन करण्यात महाराष्ट्रात यश का आले नाही. त्यांच्याकडे खरेच आमदार नाहीत की शहा हे दुर्लक्ष करीत आहेत, याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.
आधी नरेंद्र, नंतर देवेंद्र ही घोषणा फडणवीस यांच्या अंगाशी?

पुणे : भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेपासून दूर का राहिले आहेत, याचे अनेक तर्क मांडण्यात येत आहेत. शहा यांनी मध्यस्थी केली असती तर राज्यातील सत्तास्थापनेचा पेच भाजपच्या बाजूने झुकला असता, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यातही सत्ता आणण्यासाठी विद्युतवेगाने हालचाली करणाऱ्या शहा यांचा महाराष्ट्राबाबतचा थंडपणा हा फडणविसांना शहांचे महत्त्व दाखवून द्यायचा तर प्रकार नाही ना, असे बोलले जात आहे.

फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे समजले जातात आणि तसे आहे देखील. देशात नरेंद्र; ऱाज्यात देवेंद्र, हे घोषणा गेली पाच वर्षे चालली. शहा हे 2019 पूर्वी भाजपचे अध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीनंतर ते देशाचे गृहमंत्री बनले. महाराष्ट्रात प्रचारात आल्यानंतर काही ठिकाणी फडणवीस समर्थकांकडून आधी नरेंद्र, मग देवेंद्र, असाही पुकारा झाला. नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे सर्वोच्च पद घेण्यासाठी जी काही नावे भाजप वर्तुळात किंवा राजकारणात चर्चिली जातात, त्यात फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहेच.

शहा यांनाही महत्त्वाकांक्षा असू शकते. आपले स्पर्धक कोण असू शकतात, हे शहा यांनाही माहीत असणारच. त्यामुळेच त्यांनी फडणवीस यांच्यासाठी अजून तरी महाराष्ट्रात फार लक्ष घातलेले नाही, अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. शहा यांनी सत्तास्थापनेच्या प्रक्रियेता का सहभागी झाले नाही, असा प्रश्न पत्रकारांनी फडणवीस यांनाही विचारला होता. शिवसेनेसोबत चर्चाच झाली नाही. त्यामुळे निर्णय किंवा निर्णयापर्यंत चर्चा पोहोचू शकली नाही. शीर्षस्थ नेतृत्त्व चर्चेच्या अंतिम टप्प्यात सहभागी होत असते. पण चर्चाच सुरू झाली नसल्याने शहा कसे काय सहभागी होणार, असा युक्तिवाद त्यावेळी केला होता. ठाकरे यांनीही शहा हे चर्चेसाठी का आले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.

शिवसेनेशी युती करायला शहा हे तयार नव्हते. फडणवीस यांनी भाजपच्या नेतृत्त्वाला युती गळी उतरवली. आता तुम्ही तुमचे निस्तरा, असा तर पवित्रा भाजप श्रेष्ठींनी आणि विशेषतः शहांनी  घेतला नाही ना, अशीही शंका व्यक्त होत आहे. 

शिवसेनेला जे काही आश्वासन दिले ते शहांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे करीत आहेत. राज्यात फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे शहांनी नंतर स्पष्ट केले असले तरी शिवसेनेला काय आश्वासन दिले, हे त्यावर बोलत नाहीत. भाजपकडून फडणवीस हे एकाकी पडलेले नाहीत, असे सांगण्यात येते. तसेच त्यांच्यावतीने युक्तिवाद करण्यासाठी सुधीर मुनगंटिवार, चंद्रकांत पाटील हे किल्ला लढवितात. तरीही फडणवीस एकाकी पडल्याच्या चर्चा सोशल मिडियात सुरूच असतात. 

भाजप सोडून कोणत्याही पक्षाला 145 आमदारांचा पाठिंबा मिळू शकत नाही, असा शहा यांचा विश्वास आहे. त्यामुळेच ज्यांच्याकडे 145 आमदार असतील, त्यांची यादी त्यांनी राज्यपालांकडे द्यावी आणि सरकार स्थापन करावे, असे आव्हान त्यांनी शिवसेनेला दिले आहे. मुख्यमंत्री हा भाजपचा बनेल, हे सांगण्यास ते विसरत नाहीत. फक्त त्याची तारीख सांगत नाहीत. या साऱ्या घडामोडींनंतर खरेच फडणवीस सरकार पुन्हा सत्तेवर येणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com