काटोलमध्ये सलील की अनिल देशमुख? शिवसेनेचा दावा कायम; भाजपचे इच्छुकांकडून अर्ज

काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी उमेदवाराला तीन ते चार महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. त्यामुळे यावेळी पुत्र सलील यांना मैदानात उतरविण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा प्रयत्न आहे. यावेळी सलील यांचा पराभव झाला तरी पुढील निवडणूक स्वतः लढवता येईल आणि विजयी झाले तर सलीलचे इतरत्र पुनर्वसन करूनही भविष्यात काटोल कायम राखण्याची रणनीती अनिल देशमुख आखत असल्याची चर्चा काटोलमध्ये आहे.
काटोलमध्ये सलील की अनिल देशमुख? शिवसेनेचा दावा कायम; भाजपचे इच्छुकांकडून अर्ज

नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. विजयी आमदारास अवघ्या तीनच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील यांना मैदानात आणण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. दुसरीकडे युती झाली असल्याने शिवसेनेने काटोल सोडू नये, अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पण, जिंकलेला मतदारसंघ सोडण्याची भाजपची तयारी नाही. त्यांनी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहे. यामुळे युतीमध्ये पुन्हा एकदा काटोलवरून बिनसणार असल्याचे दिसते.

अनिल देशमुखांनी सलग चारवेळा निवडणूक जिंकली आहे. मात्र, मागील वर्षी त्यांचे पुतणे आशीष देशमुख यांनी त्यांना पराभूत केले होते. पुढे भाजपशी पटत नसल्याने त्यांनी मध्येच राजीनामा दिला. त्यामुळे पोटनिवडणूक होऊ घातली आहे. देशमुख कुटुंबीयास आपला दावा सोडायचा नाही. अनिल देशमुख स्वतःच लढण्यास इच्छुक आहे. मात्र, साहेबांनी केवळ सहा महिन्यांसाठी निवडणूक लढू नये, असा सल्ला कार्यकर्ते त्यांना देत आहेत. त्यांच्याऐवजी सलील यांचा प्रयोग करावा. असाही युक्तिवाद केला जात आहे. सलील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. वडील आणि काका रणजित देशमुख यांच्या निवडणुकांच्या तयारी व प्रचाराचा तगडा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

भाजपची इच्छुकांना साद
आशीष देशमुख यांनी काटोलमध्ये भाजपला खाते उघडून दिले. त्यामुळे आता भाजपचे अनेक उमेदवार लढण्यास इच्छुक आहे. अविनाश ठाकरे यांना भाजपने विस्तारक म्हणून नेमले आहे. येथून लढण्याची त्यांची सुप्त इच्छा आहे. मात्र, काटोलच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यांना विरोध आहे. भाजपचे निकटवर्ती असलेले चरणसिंग ठाकूर, पंचायत समिती सभापती संदीप सरोदे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चौहान यांनी येथून दावा केला आहे. भाजपने शिवसेनेकडे दुर्लक्ष करून भाजपच्या इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईत
युतीमध्ये काटोल मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यापूर्वी हिंगणा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला आहे. त्यानंतर रामटेक आणि काटोल हे दोनच मतदारसंघ शिवसेनेकडे शिल्लक आहेत. शिवसेनेला जिल्ह्यात जिवंत ठेवायचे असेल तर काटोल सोडू नये, अशी आग्रही मागणी सेनेची आहे. याकरिता पदाधिकारी मुंबईत गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com