पाच वर्षात भाजपने मला सत्तेचे कोणते पद दिले, तनवाणींचा पलटवार

   पाच वर्षात भाजपने मला सत्तेचे कोणते पद दिले, तनवाणींचा पलटवार

औरंगाबादः  भाजपने सगळं काही दिल्यावरही तनवाणींनी पक्ष सोडला, ते तर सत्तेचे भिक्षूक अशी टिका करणाऱ्या भाजपमधील नेत्यांवर शिवसेनेत दाखल झालेले किशनचंद तनवाणी यांनी ‘ पाच वर्षात भाजपने सत्तेच मला कोणते पद दिले़' असा सवाल उपस्थित करत पलटवार केला आहे. 

तीन वर्ष भाजपचा शहराध्यक्ष म्हणून काम करतांना मी पक्ष वाढवला, महापालिकेत १३ असलेल्या भाजप नगरसेवकांची संख्या २३ कशी झाली? याचे उत्तरही माझ्यावर टिका करणाऱ्या नेत्यांनी द्यावे असे आव्हानच तनवाणी यांनी अतुल सावे, हरिभाऊ बागडे यांना दिले आहे.

भाजपचे माजी शहाराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १९) मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून तनवाणी यांच्यावर तोफ डागण्यात आली होती. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सत्तेसाठी पक्ष सोडणारे भिक्षूक अशा शब्दांत तनवाणी यांच्यावर टिका केली होती. 

तर भाजपने सगळं काही दिल्यावरही तनवाणी यांनी पक्ष सोडला, यावरून त्यांची पात्रता लक्षात येते अशी जळजळीत टिका आमदार अतुल सावे यांनी केली होती. या सगळ्या टिका आणि आरोपांना तनवाणी यांनी आज शहरात दाखल होताच प्रत्युत्तर दिले. 

सरकारनामाशी बोलतांना तनवाणी म्हणाले, सत्तेसाठी मी शिवसेनेत गेलो असा आरोप करणाऱ्या बागडे यांनी गेली पाच वर्ष राज्यात आणि केंद्रात सत्ता असतांना आणि राज्यात तुम्ही नेते असतांना मला कोणते सत्तेचे पद दिले. भाजपमधील पक्षांर्तगत संघटनेत झालेल्या बदलांनी ते तरी समाधानी आहेत का? कुणी पक्ष सोडल्याने त्या पक्षाला काही फरक पडत नसतो या अतुल सावे यांच्या मताशी मी सहमत आहे.

 पण शिवसेनेतून मी जेव्हा भाजपमध्ये आलो, शहराध्यक्ष झालो त्यांनतर शहरात पक्षाची झालेली भरभराट ते नाकारतील का? २०१५ च्या आधी महापालिकेत भाजप नगरसेवकांची संख्या किती होती, मी आल्यानंतर ती २३ पर्यंत वाढली हे ते नाकारतील का? असा सवालही तनवाणी यांनी उपस्थित केला.

मी भाजपला मोठे केले..
२०१४ मध्ये भाजपात आल्यानंतर तीन वर्ष माझ्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी होती. या काळात मी शहर आणि जिल्ह्यात भाजप मजबूत करण्यासाठी काम केले. वार्ड अध्यक्ष, व्यापारी आघाडी, वकील सेल निर्माण करत विविध घटकांना पक्षाशी जोडले. २०१५ च्या महापालिका निवडणुकीत युती झाली, त्यामुळे भाजप नगरसेवकांची संख्या महापालिकेत वाढली.

 एकट्या मध्य मतदारसंघात भाजपचे ९ नगरसेवक आहेत. माझ्यावर समर्थकांना पदे दिल्याचा आराप केला जातो, त्यात देखील तथ्य नाही. माझ्या भावाल किंवा मुलाला सत्तेचे कोणते पद मी दिले, जी पद दिली ती संघटना वाढावी या दृष्टीतून दिली.

राज्यात आणि केंद्रात सत्ता असतांना माझे कोणतेही वैयक्तिक काम मी राज्याच्या नेतृत्वाकडे घेऊन गेलो नाही. मग कशाचा आधारावर भाजपने मला सगळं काही दिल आणि तरी मी सत्तेसाठी शिवसेनेत गेलो असा आरोप भाजपचे नेते करीत आहेत असा जाब देखील तनवाणी यांनी विचारला.

शिवसेना देईल ती जबाबदारी मान्य..

शिवसेनेत प्रवेश करतांना कुठल्या जबाबदारीचे आश्वासन तुम्हाला दिले गेले, यावर सध्या महापालिका निवडणुकीचे वारे आहे, त्या अनुषंगाने एखादी जबाबदारी दिली जाईल असे वाटते. पण माझा कुठलाही आग्रह किंवा मागणी पक्षाकडे नाही. जी जबाबदारी पक्ष माझ्यावर टाकेल ती मी पुर्ण क्षमतेने पार पाडील एवढे मात्र निश्चित. 

शिवसेनेने मला खूप काही दिले आहे, शहरप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेता, महापौर, म्हाडाचे अध्यक्षपद, विधान परिषदेत आमदार अशी अनेक पद दिली आहेत. त्यामुळे आता पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल असेही तनवाणी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com