संगमनेर : पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील 31 वर्षीय मल्हारी बटुळे या शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या करणे अत्यंत वेदनादायी असून, अत्यंत सुलभ पध्दतीने कर्जमाफी केल्यानंतरही असे प्रकार घडत असतील, तर आमचे नेमके कुठे चुकते, याचा विचार करणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे सांगितले.
भाऊसाहेब थोरात साखर कारखाना कार्यस्थळावर नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ''राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देण्याचे काम लोकशाही आघाडी सरकार निश्चित करीत आहे. दोन लाखांपर्यंत व त्यापुढील रकमेसाठी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेवून दिलासा देणार आहोत. मागील सरकारच्या काळात दीड लाखांच्या कर्जमाफीसाठी कुटूंबासह रात्रंदिवस लागणाऱ्या रांगा, किचकट अटी व फॉर्म तसेच मागील बाकी रक्कम भरण्याची अट असे निकष होते. मात्र आमच्या सरकारने ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे.''
या कर्जमुक्तीमुळे शेतकऱयांच्या जीवनाला नव्याने सुरवात होणार असून, अशा लाभार्थ्यांची संख्या फार मोठी असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी मनोधैर्य न गमावता आपल्या कुटूंबासाठी पाय रोवून भक्कमपणे उभे रहावे सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
''आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याचे विधेयकात रुपांतर करून, कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आमचे सरकार कोर्टात टिकेल असे ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना आरक्षण देणार आहे. धर्म म्हणून नाही तर आर्थिकदृष्ट्या मागास मुस्लिमांना मदत करणे लोकशाहीची गरज आहे. आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.