औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात शहरातील एकही गरीब किंवा गरजू व्यक्ती उपाशीपोटी राहू नये यासाठी त्यांना अन्न पाकीट व धान्य पुरवण्यात येत आहे. विविध सामाजिक संस्था , राजकीय नेते व पक्ष झटत असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील कम्युनिटी किचन आणि घरपोच धान्य देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
ज्यांना कुणाला धान्याची गरज असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, त्यांना धान्य पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असे आवाहन इमतियाज जलील यांनी केले आहे.
22 मार्चला जनता कर्फ्यू झाल्यानंतर लगेच रात्री बारा वाजेपासून संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती . कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय योग्य असला, तरी राज्यातील व देशातील कितीतरी लोक हे दररोज कमावून आपल्या पोटाची खळगी भरतात .तर काही गरिबांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही अशी परिस्थिती आहे .
लॉकडाऊन दरम्यान अशा गरजूंना जेवण किंवा धान्य पुरवण्याची संकल्पना इमतियाज जलील यांनी मांडली होती. अनेक दानशूर व्यक्तींच्या तसेच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शहरातील विविध भागात कम्युनिटी किचन उभे करून जेवण पोहोचवण्याचे काम एमआयएमकडून सुरू आहे.
आता ज्यांना धान्याची गरज आहे अशा गोरगरीब कुटुंबांना घरपोच धान्य पोहोचण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इम्तियाज जलील यांनी सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींद्वारे धान्याची गरज असलेल्या कुटुंबाची माहिती देण्याचे आवाहन केले आहे .
गरजूंची माहिती मिळताच त्यांना पाच किलो गहू ,पाच किलो तांदूळ ,एक किलो साखर, एक किलो चणाडाळ ,एक किलो मुगडाळ ,चहा पावडरचे पाकीट आणि एक तेलाची बॅग असे किट देण्यात येणार आहे .धान्याचे हे किट तयार करण्याचे काम इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.